राज्यपालांच्या विमान प्रवासाबाबत सरकार म्हणतं, आमची काही चूक नाही!

मुंबई तक

• 03:10 PM • 11 Feb 2021

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विमान प्रवासावरुन झालेल्या एकूण वादाबाबत आता राज्य सरकारने देखील आपली बाजू मांडली आहे. राज्यपालांना ऐनवेळी शासकीय विमानातून प्रवासासाठी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच राजभवनातील अधिकाऱ्यांनी योग्य संवाद न साधल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. पाहा […]

Mumbaitak
follow google news

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विमान प्रवासावरुन झालेल्या एकूण वादाबाबत आता राज्य सरकारने देखील आपली बाजू मांडली आहे. राज्यपालांना ऐनवेळी शासकीय विमानातून प्रवासासाठी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच राजभवनातील अधिकाऱ्यांनी योग्य संवाद न साधल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

पाहा राज्य सरकारने नेमकं काय स्पष्टीकरण दिलं आहे.

‘राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही.’

‘राजभवनाने राज्यपाल महोदयांना विमान घेऊन जाण्यास मान्यता देण्याविषयी राज्य शासनास विनंती केली होती. शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार परवानगी मागितली जाते व मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते असा प्रघात आहे. यानुसार काल म्हणजे बुधवार दिनांक 10 फेब्रुवारीस मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. ही मान्यता मिळाल्यानंतरच राजभवन सचिवालयाने राज्यपाल महोदयांच्या विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणे अपेक्षित होते. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्याने राज्यपाल महोदयांना शासकीय विमानाने इच्छित स्थळी जाता आले नाही.’

‘वस्तूत: राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते, ते झाले नसल्याने या प्रकाराबाबत शासनाने देखील गंभीर दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.’

पाहा राज्यपालांच्या कार्यालयाकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलं होतं:

१. महाराष्ट्र व गोव्याचे माननीय राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंड येथील मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे आयएएस अधिकाऱ्यांच्या १२२व्या प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. हा कार्यक्रम शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 पार पडणार आहे.

२. याच कार्यक्रमासाठी राज्यपाल हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून देहरादूनला गुरुवारी 11 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता रवाना होणार होते.

3. या प्रवासाच्या तयारीच्या वेळी राज्यपाल कार्यालयाने महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांना राज्यपालांना सरकारी विमानाच्या वापरास परवानगी मिळावी म्हणून 2 फेब्रुवारी 2021 रोजी पत्र लिहिले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाल देखील कळविण्यात आले होते.

४. आज, 11 फेब्रुवारी 2021 रोजी, राज्यपाल सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSIM) पोहोचले आणि सरकारी विमानात चढले. तथापि, माननीय राज्यपालांना सांगण्यात आले की, शासकीय विमानाच्या वापरासाठी त्यांना सरकारकडून परवानगी मिळालेली नाही.

5. माननीय राज्यपालांच्या निर्देशानुसार देहरादूनसाठी व्यावसायिक विमानाचं तिकीट बुक करण्यात आलं. त्यानंतर राज्यपाल हे मुंबई विमानतळावरुन दुपारी १२.१५ वाजता देहरादूनसाठी रवाना झाले.

    follow whatsapp