भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी हल्ला झाला. त्यानंतर भाजप विरूद्ध शिवसेना असा संघर्ष तीव्र झाला आहे. रवी राणा आणि नवनीत राणा यांना अटक झाल्यानंतर रात्री उशिरा किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला झाला. किरीट सोमय्या हे जेव्हा खार पोलीस ठाण्यात पोहचले तेव्हा शिवसैनिक आणखी आक्रमक झाले होते. या सगळ्या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“किरीट सोमय्यांवर जो हल्ला झाला त्या हल्ल्याला पोलीस पाठिंबा देत आहेत का? किरीट सोमय्यांच्या कारवर हल्ला होणार हे पोलिसांना कळलं नाही? झेड सुरक्षा असलेल्या किरीट सोमय्यांबाबत अशी हयगय करणं अशा प्रकारे हलगर्जीपणा दाखवणं गैर आहे. मुंबई पोलिसांच्या इतिहासातलं हा सर्वात लाजिरवाणा अध्याय आहे. मुंबई पोलीस सरकारच्या दबावाखाली येऊन काम करत आहेत. आम्ही याआधी कधीही असं चित्र मुंबईत पाहिलेलं नाही.”
“किरीट सोमय्या हे अधिकृतपणे पोलीस ठाण्याला कळवून आले होते. त्यांनी हे सांगितलं होतं की माझ्यावर हल्ला होऊ शकतो. तरीही पोलीस काहीही करत नाहीत. पोलिसांनी एक प्रकारे गुंडांच्या हवालेच त्यांना केले. आम्ही आता केंद्र सरकारकडे निवेदन करणार आहोत की जे पोलीस आपलं कर्तव्य पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी. महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणू हे म्हणणाऱ्या राणा दाम्पत्याला ज्या प्रकारे अटक केली गेली. हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही तर मग काय पाकिस्तानात म्हणणार का? एका महिलेला अटक करण्यात आली. एका महिलेला महाराष्ट्र सरकारला भीती वाटली की लोकं जमा करून त्या महिलेवर आणि तिच्या पतीवर हल्ला करावा लागला.” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांवर काय म्हणाले फडणवीस?
“शरद पवार टीका करत आहेत. त्यांनी थोडं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढते आहे. महाराष्ट्रात लोड शेडिंग पुन्हा सुरू झालं आहे. महाराष्ट्रात कुणी यायला तयार का नाही? याचा विचार शरद पवार यांनी केला पाहिजे. महाराष्ट्राचे दोन मंत्री जेलमध्ये आहेत. आज एका मोठ्या पत्रकाराचा ट्विट मी वाचत होतो त्यात त्यांनी लिहिलं आहे मॉरिशसचे पंतप्रधान महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांच्या स्वागताला एक उपसचिव पाठवण्यात आला. त्यांना लक्झरी गाडीही दिली गेली नाही. जर एखाद्या राष्ट्राच्या पंतप्रधानांना अशी वागणूक दिली जाणार असेल तर कुणी कशाला राज्यात येईल?” असंही देवेंद्र फडणवीस यांनी विचारलं आहे.
ADVERTISEMENT