Dharashiv ZP, गणेश जाधव : धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला आहे. अध्यक्षपदी भाजपच्या अर्चना पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या (शिंदे गट) उषा गायकवाड यांची निवड बहुमताने निवड झाली आहे. विशेष म्हणजे 1962 नंतर जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा उमेदवार अध्यक्षपदी निवडून आला असल्याने या निकालाला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ADVERTISEMENT
दोन्ही पदांवर महायुतीचे वर्चस्व
अध्यक्षपदासाठी भाजपच्या अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांनी 45 मते मिळवत विजय मिळवला, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी ठाकरे गटाच्या कांचनमाला संगवे यांना 9 मते मिळाली. तसेच काँग्रेसचा एक सदस्य अनुपस्थित राहिल्याची नोंद झाली. उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उषा रवींद्र गायकवाड यांनीही 45 मते मिळवत बाजी मारली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे महेश देशमुख यांना 10 मते मिळाली. जिल्हा परिषदेत एकूण 55 सदस्य असताना महायुतीने मोठ्या मताधिक्याने दोन्ही पदांवर वर्चस्व सिद्ध केले.
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत रंगली. अध्यक्षपदासाठी भाजपकडून तेर गटाच्या सदस्या अर्चना पाटील, तर महाविकास आघाडीकडून शिराढोण गटातील कांचनमाला संगवे रिंगणात होत्या. उपाध्यक्षपदासाठी कडेर गटातील सदस्य उषा गायकवाड आणि कवठा गटातील काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात सामना झाला.
कडेकोट पोलिस बंदोबस्तात निवडणूक
निवडणुकीदरम्यान जिल्हा परिषद परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिवसभर पाहायला मिळाली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा नेते मल्हार पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, उमरगा नगराध्यक्ष किरण गायकवाड तसेच अपक्ष सदस्य धनंजय सावंत उपस्थित होते.
हे ही वाचा : Success Story : आई धुणीभांडी करायची, वडील वॉचमन; पुण्याच्या तरुणाने थेट UPSC परीक्षेत मिळवलं यश
राजकीय परिणाम
जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भाजपचा पहिल्यांदाच विजय झाल्याने धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे मानले जात आहे. महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले वर्चस्व अधिक मजबूत केले असून आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विजयाकडे ‘राजकीय ट्रेंड सेट करणारा निकाल’ म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीसाठी हा निकाल संघटनात्मक बळकटीकरणाची गरज अधोरेखित करणारा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
'असे' आहे जिल्हा परिषदेतील संख्याबळ
धाराशिव जिल्हा परिषदेत सध्याचे संख्याबळ पुढीलप्रमाणे आहे : भाजप-19, शिवसेना-15, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)-6, शिवसेना (ठाकरे गट)-7, काँग्रेस-3, अपक्ष-4 आणि समाजवादी पक्ष-1.
ADVERTISEMENT











