कोरोनाचा विळखा होतोय घट्ट, 70 आमदार आणि 15 मंत्र्यांना कोरोना संसर्ग-राजेश टोपे

मुंबई तक

• 08:29 AM • 05 Jan 2022

कोरोनाचा विळखा घट्ट होतो आहे. काळजी घेण्याची अत्यंत जास्त गरज आहे असं म्हणत असतानाच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 70 आमदार आणि 15 मंत्र्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. हिवाळी अधिवेशन हे कोरोनाचा सुपरस्प्रेडर ठरलंय का अशी चर्चा आता राजेश टोपे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झाली आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंट आणि कोरोना यांचा संसर्ग झपाट्याने […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाचा विळखा घट्ट होतो आहे. काळजी घेण्याची अत्यंत जास्त गरज आहे असं म्हणत असतानाच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 70 आमदार आणि 15 मंत्र्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. हिवाळी अधिवेशन हे कोरोनाचा सुपरस्प्रेडर ठरलंय का अशी चर्चा आता राजेश टोपे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झाली आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंट आणि कोरोना यांचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्स आणि आऱोग्य विभागाची बैठक पार पडली. त्या नंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही मात्र कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येला आळा घालायचा असेल तर गर्दी टाळली पाहिजे. गर्दी जिथे होते तिथे नियंत्रण आणलं गेलं पाहिजे. राज्यात लॉकडाऊन लागणार नसला तरीही निर्बंध येतील आणि त्यासंदर्भातला अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

याचवेळी राज्यातील 70 आमदार आणि 15 मंत्री करोनाबाधित असल्याचे ते म्हणाले. हे सर्व दररोज कामानिमित्त फिरायचे. लोकांच्या सातत्याने संपर्कात होते. त्यामुळे या आमदार आणि मंत्र्यांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

राज्यात कोरोनाचे संकट गहिरं होताना दिसत असून मंगळवारी कोरोनाच्या तब्बल 18 हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णांची भर पडली आहे. राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्यात येणार नसून निर्बंध कडक करण्यात येतील, असं आरोग्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. राज्यातील ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी राज्यात ओमिक्रॉनच्या आणखी 75 रुग्णांची नोंद झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी राज्यात नेमकी काय स्थिती आहे याचा टास्क फोर्सकडून आढावा घेतला. मंत्रालयातल्या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला जाणार आहे. त्यानतंर मुख्यमंत्री कोणते निर्बंध लावायचे यासंबंधी निर्णय़ घेणार आहेत. त्यानुसार काही कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. आज रात्री यासंबंधी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यात करोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे, इतर विभागांनी त्यांच्याशी समन्वयाने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. योग्य प्रकाराच्या मास्कचा वापर, आरोग्य यंत्रणेकडील मनुष्यबळ, प्रमाणित उपचार पद्धती, विलगीकरण कालावधी आदी विषयांवर कोविड टास्कफोर्सच्या टीमसोबत उपमुख्यमंत्र्यांनी विस्तृत चर्चा केली.

    follow whatsapp