कोल्हापूर : पत्नी अन् 2 लेकरांचा डोळ्यासमोर मृत्यू, अडीच वर्ष आठवणींनी छळलं; शेवटी...

Kolhapur News : कोल्हापूर येथील पुईखडी घाटात अडीच वर्षांपूर्वी झालेल्या बस अपघातात पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर, त्या विरहातून पुणे येथील विराट गौतम यांनी त्याच अपघातस्थळी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

Kolhapur News

Kolhapur News

मुंबई तक

16 May 2026 (अपडेटेड: 16 May 2026, 02:03 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर : पत्नी अन् 2 लेकरांचा डोळ्यासमोर मृत्यू,

point

अडीच वर्ष आठवणींनी छळलं; शेवटी...

Kolhapur News : पुण्यातील रहिवासी असलेले विराट गौतम हे आपल्या कुटुंबासह गोवा येथे फिरायला गेले होते. 23 नोव्हेंबर 2023 रोजी एका खाजगी आरामबसने (ट्रॅव्हल्स) ते पुण्याच्या दिशेने परत प्रवास करत होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही आरामबस कोल्हापूर जवळील पुईखडी घाटात आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस भीषणपणे पलटी झाली. या अपघातात नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले, तर तिघांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातामध्ये जखमी झालेल्या विराट गौतम यांच्या डोळ्यांसमोर त्यांची पत्नी नीला, मुलगी रसिका आणि मुलगा शर्विल यांचा मृत्यू झाला. या अत्यंत भीषण आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगाने विराट गौतम यांना जबर मानसिक धक्का बसला. कुटुंबाचा अंत्यविधी आटोपून विराट गौतम पुण्यातील आपल्या घरी परत गेले, मात्र त्यांना सातत्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाची आठवण छळत होती.

हे वाचलं का?

हेही वाचा : हॉटेलच्या रुममध्ये हिडन कॅमेरे, तसले व्हिडीओ करायचे शूट; अन्.., शेवटी काय घडलं?

कुटुंबाच्या विरहाने व्याकुळ झालेले विराट गौतम हे नित्यनियमाने पुण्याहून कोल्हापुरात येत असत. ते पुईखडी घाटातील त्याच अपघातस्थळी जायचे आणि तिथे बसून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून द्यायचे. ते दरवेळी अपघातस्थळावर आपल्या पत्नी आणि मुलांच्या स्मरणार्थ तीन हार अर्पण करून निघून जायचे आणि असे अनेकदा घडले. सातत्याने तिथे येऊन रडत बसत असल्यामुळे स्थानिक नागरिक आणि तिथल्या व्यावसायिकांना त्यांच्याबद्दल माहिती झाली होती. यावर्षी 10 मे रोजी विराट गौतम हे पुन्हा एकदा कोल्हापुरात आले होते. त्यानंतर सलग दोन दिवस ते पुईखडी घाटातील अपघातस्थळावर अत्यंत विषण्ण आणि नैराश्याच्या अवस्थेत बसलेले स्थानिक नागरिकांना दिसून आले होते, मात्र त्यानंतर ते अचानक तिथून गायब झाले.

हेही वाचा : 'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये', प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे संतापजनक मागणी

अपघातस्थळी सुटलेली दुर्गंधी आणि पोलिसांचा तपास

आज सकाळी पुईखडी घाटाच्या या परिसरात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी सुटल्याने स्थानिक नागरिकांनी आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली. नागरिकांनी शोध घेतल्यावर तिथे एका व्यक्तीचा बेवारस मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. करवीर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृताच्या कपड्यांची आणि त्याच्याजवळ असलेल्या बॅगेची कसून तपासणी केली. या तपासणी दरम्यान पोलिसांना मृतदेहाजवळ एक मोबाईल फोन आणि ओळखपत्र सापडले. या ओळखपत्रावरील आणि साहित्यावरील माहितीवरून तो मृतदेह दुसरा कोणाचा नसून पुणे येथील विराट गौतम यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.

कुटुंबाच्या विरहातून टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज

पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विराट गौतम यांनी त्याच अपघातस्थळी विषारी औषध पिऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबापासून विभक्त होऊन आपण एकटे जगू शकत नाही, याच तीव्र मानसिकतेतून आणि नैराश्यातून विराट गौतम यांनी हे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ज्या ठिकाणी अडीच वर्षांपूर्वी त्यांच्या हसत्याखेळत्या कुटुंबाचा अंत झाला, त्याच ठिकाणी त्यांनीही आपल्या आयुष्याचा शेवट केला. या हृदयद्रावक आणि अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे कोल्हापूर आणि पुणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून करवीर पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत आहेत.