Mumbai News : मुंबई शहरात नुकतीच 10 टक्के पाणीकपात करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर बीएमसीने पाणीपुरवठ्याच्या मुख्य वाहिन्यांना किंवा थेट नळांना बेकायदेशीरपणे इलेक्ट्रिक मोटर पंप जोडून अतिरिक्त पाणी खेचणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. यामध्ये जर कुणी दोषी आढळला तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
कमी दाबाने पाणीपुरवठा का होतो?
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाणी चोरी करणाऱ्यांविरोधात तपासणी मोहीम तीव्र करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी कमी दाबाने पाणीपुरवठा का होतो, यामागील कारण स्पष्ट केले. बेकायदेशीरपणे पाण्याचा उपसा केल्यामुळे पाण्याचे वाटप करण्यात अडथळे निर्माण होतात आणि अनेक भागांत पाण्याचा दाब कमी होतो, असे त्यांनी सांगितले. नागरिकांकडून येणाऱ्या कमी दाबाने पाणी मिळण्याच्या तक्रारींमागे मुख्यत्वे जलवाहिन्यांना आणि थेट नळांना अनधिकृतपणे लावण्यात आलेले इलेक्ट्रिक पंप हेच मुख्य कारण असल्याचे बांगर यांनी नमूद केले. या प्रकारांमुळे इतर परिसरातील नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळण्यात अडचणी येतात.
हे ही वाचा : “बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे RTI कार्यकर्ते, सोशल मीडिया युजर्स बनतात अन्..”, सरन्यायाधीश काय म्हणाले?
बांगर यांनी दिला कडक इशारा
पाणीकपातीच्या या काळात नागरिकांना नियमित वेळेत आणि पुरेशा दाबाने पाणी मिळेल याची खात्री करण्याचे निर्देश पालिकेने दिले. उंचावरील भाग, मुख्य केंद्रांपासून दूर असलेले परिसर आणि जिथे आधीच कमी वेळ पाणी येते, अशा संभाव्य अडचणीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. सर्व अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याच्या वेळी प्रत्यक्ष मैदानात उपस्थित राहून नागरिक आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधावा आणि तक्रारींचे तात्काळ निवारण करावे, असे बांगर यांनी सांगितले. कामात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही बांगर यांनी दिला आहे.
हे ही वाचा : कोल्हापूर : पत्नी अन् 2 लेकरांचा डोळ्यासमोर मृत्यू, अडीच वर्ष आठवणींनी छळलं; शेवटी...
..तर पाणीपुरवठा खंडित केला जाईल
या मोहिमेदरम्यान तपासणी पथकांना अनधिकृतपणे वापरले जाणारे इलेक्ट्रिक मोटर पंप आढळल्यास ते तातडीने जप्त केले. वारंवार असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तींना केला जाणारा पाणीपुरवठा खंडित केला जाईल आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. याशिवाय, अशा अनाधिकृत जोडण्यांमुळे संपूर्ण जलवाहिनीच्या नेटवर्कमध्ये दूषित पाणी किंवा अशुद्धता पसरण्याचा आणि जलप्रदूषणाचा धोका वाढतो, याकडेही पालिका प्रशासनाने लक्ष वेधले आहे.
ADVERTISEMENT











