मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द! सुप्रिया सुळेंना झाली शरद पवारांच्या आंदोलनाची आठवण, म्हणाल्या…

मुंबई तक

• 06:34 AM • 06 Dec 2022

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चर्चेत आलाय. यापार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई हे बेळगाव दौऱ्यावर जाणार होते, मात्र हा दौरा रद्द करण्यात आलाय. शिंदे-फडणवीस सरकारने दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुप्रिया सुळे शरद पवारांच्या आंदोलनाची आठवण सांगत अप्रत्यक्षपणे शिंदे-फडणवीस सरकारला डिवचलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगितल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चर्चेत आलाय. यापार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई हे बेळगाव दौऱ्यावर जाणार होते, मात्र हा दौरा रद्द करण्यात आलाय. शिंदे-फडणवीस सरकारने दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुप्रिया सुळे शरद पवारांच्या आंदोलनाची आठवण सांगत अप्रत्यक्षपणे शिंदे-फडणवीस सरकारला डिवचलं आहे.

हे वाचलं का?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगितल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून वर आला आहे. दोन्ही राज्यांच्या सीमा भागात आंदोलनं आणि निदर्शनं केली जात असून, या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई बेळगावला जाणार होते. मात्र, बेळगावला येऊ नये, अशी सूचना कर्नाटक सरकारने केल्यानंतर दौरा रद्द करण्यात आला. यावर सुप्रिया सुळेंनी एक पोस्ट केलीये.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : सुप्रिया सुळेंची पोस्ट… शरद पवारांचं आंदोलन

“कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद सुरु झाला असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा कर्नाटकच्या तंबीनंतर रद्द करण्यात आला. ही बातमी वाचली आणि मला पवार साहेबांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण झाली. साहेबांनी कर्नाटक पोलीसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही. खुद्द एस. एम. जोशी देखील साहेबांच्या पाठीवर उमेटलेले वळ पाहून हळहळले होते. तो काळच तसा होता”, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

कन्नड संघटनांची मागणी कर्नाटक प्रशासनाकडून मान्य; महाराष्ट्रातील नेत्यांना ‘बेळगाव बंदी’

सुप्रिया सुळे पुढे म्हणतात, “सीमाभागात राहणाऱ्या जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत होती. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केली. याविरोधात मोठं आंदोलन उभं करण्याचा निर्णय समितीने घेतला. खुद्द एस. एम. जोशी यांनी १९८६ मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचं नियोजन केलं. महाराष्ट्रातले नेते बेळगावमध्ये जावून भर चौकात निषेध नोंदवतील, असं ठरविलं. अर्थातच याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली.”

“पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय पवार साहेबांकडे होते.बेळगावात दाखल होण्यासाठी साहेबांनी एक शक्कल लढविली. ते कोल्हापुरात गेले. तिथून एक फियाट गाडी घेतली. सोबत बाबासाहेब कुपेकर आणि एक ड्रायव्हर घेतला. साहेबांनी स्वतः ड्रायव्हर असल्याची बतावणी केली. खऱ्या ड्रायव्हरला मागे मालकाच्या जागी बसवलं. तिघे जण निघाले. चेकपोस्टवर पोलिसांनी चौकशी केली परंतु त्यांना काहीच कळलं नाही.”

उद्धव ठाकरेंना आंदोलनावरुन टोला ते बेळगाव दौरा रद्दची घोषणा : एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“साहेब बेळगावात पोहोचले पण कुणालाही थांगपत्ता लागला नव्हता. बेळगावात जमावबंदी होती. साहेब पूर्वीच पोहोचले असल्यामुळे अरविंद गोगटेंच्या घरी त्यांनी मुक्काम केला.आंदोलनाची वेळ झाली. बरोबर ११ वाजता राणी चेन्नमा चौकात लोक जमू लागले. अचानकपणे हजारो लोक जमल्याने पोलिस गोंधळले. संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. साहेब, बाबासाहेब कुपेकर, आदींना पोलिसांनी बेदम मारहाण केली.”

सारंच ३६० अंशात बदललंय, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“साहेबांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर आणण्यात आलं. तेथेही लोक जमा झाले. वयस्कर एस. एम. जोशी साहेबांना भेटायला गेले. त्यांनी साहेबांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले. ते पाहून एसएम हळहळले होते. हा भारावलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे? सारंच ३६० अंशात बदललंय”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारने मंत्र्यांच्या दौरा रद्द करण्याच्या निर्णयावर टीका केलीये.

    follow whatsapp