संजय शिरसाटांचा ‘गेम’ झाला! नवख्यांमध्ये ‘सिनिअर’ शिरसाट ‘ज्युनिअर’ कसे झाले?

मुंबई तक

• 02:56 AM • 11 Aug 2022

शिंदेंच्या बंडामध्ये ठाकरेंवर पहिला वार केला, पहिला हल्ला चढवला, त्याच संजय शिरसाटांचा मोठा गेम झालाय. तीनवेळा आमदार झालेल्या शिरसाटांचा मंत्रिमंडळ विस्तारात पत्ता कट झाला. तर औरंगाबादेतील नवखे लोक शिरसाटांना सिनिअर झालेत. कानामागून आले आणि तिखट झाले, असंच काहीसं शिरसाटांचं झालंय. त्यामुळेच आपण शिरसाटांचं मंत्रीपद कसं हुकलं, शिरसाटांचे जुनिअर कसे मंत्री झाले आणि त्याचा शिरसाटांच्या, औरंगाबादच्या […]

Mumbaitak
follow google news

शिंदेंच्या बंडामध्ये ठाकरेंवर पहिला वार केला, पहिला हल्ला चढवला, त्याच संजय शिरसाटांचा मोठा गेम झालाय. तीनवेळा आमदार झालेल्या शिरसाटांचा मंत्रिमंडळ विस्तारात पत्ता कट झाला. तर औरंगाबादेतील नवखे लोक शिरसाटांना सिनिअर झालेत. कानामागून आले आणि तिखट झाले, असंच काहीसं शिरसाटांचं झालंय. त्यामुळेच आपण शिरसाटांचं मंत्रीपद कसं हुकलं, शिरसाटांचे जुनिअर कसे मंत्री झाले आणि त्याचा शिरसाटांच्या, औरंगाबादच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो?

हे वाचलं का?

औरंगाबाद हा शिवसेनेचा, ठाकरेंचा बालेकिल्ला. पण ठाकरेंना इथेच मोठा झटका बसला. शिंदेंच्या बंडाला सर्वाधिक प्रतिसाद औरंगाबादमधूनच मिळाला. सहापैकी ५ आमदार बंडात सामील झाले. यामध्ये ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांचाही समावेश होता. शिंदे गटातून बंडानंतर ठाकरेंवर पत्र लिहून पहिला हल्ला केला तो औरंगाबादच्याच संजय शिरसाटांनी. या हल्ल्यामागे आपल्याला मविआमध्ये मंत्रिपद मिळालं नाही, याची बोचही होती. औरंगाबादचं राजकारण सध्या हिंदुत्वाच्या त्रिकोणात विभागलं गेलंय. शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजप. यात शिरसाट हे औरंगाबादमधला शिंदे गटाचा चेहरा आहेत.

त्यामुळेच तीन वेळा आमदार झालेल्या शिरसाटांना ठाकरेंनी दिलं नाही, ते शिंदे देतील, असं वाटत होतं. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिरसाटांचे शेकडो समर्थक मुंबईत दाखल झाले. पण ज्यांचं नाव मंत्रिपदासाठी सर्वाधिक चर्चेत होतं, त्या शिरसाटांचा पत्ता कट झालाय. शिंदेंनी जुन्यांनाच संदीपान भुमरे, अब्दुल सत्तारांना संधी देत शिरसाटांना वेटिंगला टाकलं. आणि याचमुळे शिरसाट औरंगाबादच्या राजकारणात बॅकफूटवर गेलेत. ज्यांच्याशी स्पर्धा आहे, त्यांनी नवख्यांना ताकद दिलीय, तर जुनेजानते शिरसाट अजून वेटिंगलिस्टवरच आहेत.

अब्दुल सत्तार, संजय राठोडांना सेफ करणाऱ्या ‘या’ शिंदे फॉर्म्युल्यानेच संजय शिरसाटांचा घात?

भाजपने, ठाकरेंनं शिंदेंना जुनिअर असलेल्यांना महत्त्वाची, मोक्याची पद दिलीत. बंडखोरीनंतर शिरसाट आणि अंबादास दानवे कडाक्याची शाब्दिक हाणामारी झाली. आता त्याच दानवेंना ठाकरेंनी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद दिलंय. पहिल्यांदाच आमदार झालेल्या दानवेंना मंत्रीपदाचा दर्जा असलेलं पद दिलं. हा शिरसाटांसाठी मोठा झटका असल्याचं म्हटलं जातंय.

भाजप-अतुल सावे : औरंगाबाद काबीज करण्याचा दावा?

दुसरीकडे भाजपने दुसऱ्यांदा आमदार झालेल्या औरंगाबादच्याच अतुल सावेंना पुन्हा मंत्री केलं. तसंच कधीकाळी औरंगाबादचे महापौर राहिलेल्या औरंगाबादकरांच्या विस्मरणात गेलेल्या डॉ. भागवत कराडांनाही भाजपने राज्यसभेवर पाठवून मोदींच्या मंत्रिमंडळात अर्थराज्यमंत्री केलंय. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने सावेंना मंत्री करून शिंदे गट सोबत असला तरी आपला औरंगाबाद काबीज करण्याचा दावा मात्र सोडला नाही.

दानवे, सावे, कराड हे मंत्रीपद : संजय शिरसाट ज्युनिअर

दानवे, सावे, कराड हे मंत्रीपद मिळाल्यानं औरंगाबादच्या राजकारणात सिनिअर असलेले संजय शिरसाट आपोआपच ज्युनिअर झालेत. आता शिष्टाचारानुसार शिरसाटांचं नाव मागून आलेल्या लोकांनंतर येणार आहे. आणि हीच बोचणी शिरसाटांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर पत्रकारांना बोलूनही दाखवली. मी नाराज झालो, पण आहे तिथेच ठीक आहे, असं शिरसाट सांगतात. सध्याच्या घडीला कानामागून आले आणि तिखट झाले, असं शिरसाटांच्या बाबतीत झालं आहे.

    follow whatsapp