Saayoni Ghosh : तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत गटबाजीने आता गंभीर वळण घेतले असून, पक्षातील असंतुष्ट खासदारांची दिल्लीवारी सुरु झाली आहे. जादवपूरच्या लोकसभा खासदार सायोनी घोष आणि खासदार माला रॉय यांनी रविवारी नवी दिल्लीत पोहोचून आपल्या राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, यावेळी सायोनी घोष यांनी सध्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असला, तरी त्या असंतुष्ट गटात सामील झाल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी 'मी चड्डी बनणार नाही', असं म्हणत खासदार राघव चड्ढा यांच्याबाबत टिप्पणी केली. शिवाय आपण निष्ठावंत म्हणून काम करणार असल्याचंही सांगितलं होतं. मात्र, निवडणुकीत पराभव होताच त्यांनी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची साथ सोडली आहे. पत्रकारांनी यावरुन प्रश्न विचारल्यानंतर त्या निरुत्तर झाल्याचं पाहायला मिळालं.
ADVERTISEMENT
दरम्यान, सोमवारी हा असंतुष्ट खासदारांचा गट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेण्याची शक्यता असून, लोकसभेत आपल्याला स्वतंत्र बसण्याची व्यवस्था मिळावी, अशी मागणी ते करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : पांढऱ्या पट्टीचा वाद: 'निलेश चंद्रांनी चंद्रावर राहावं, धर्म घरात..' मनसे नेता प्रचंड चिडला!
महुआ मोईत्रा काय म्हणाल्या?
पक्षांतर्गत वादाचे पडसाद महुआ मोइत्रा यांच्या 'एक्स'वरील पोस्टनंतर अधिक तीव्र झाले आहेत. कृष्णानगरच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी ज्येष्ठ खासदार सुदीप बंद्योपाध्याय यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. बंद्योपाध्याय यांनी आपण कोलकात्याच्या रुग्णालयात दाखल असल्याचे सांगितले होते, मात्र ते दिल्लीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या भेटीसाठी गेल्याचे समोर आल्यानंतर पक्षातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुदीप बंद्योपाध्याय आणि शताब्दी रॉय यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्याने तृणमूल काँग्रेसमधील गटबाजी आता चव्हाट्यावर आली असून, या भेटीमुळे पक्षात नाराजीचा सूर उमटत आहे.
हेही वाचा : 'तो गेला, मीसुद्धा वाचणार नाही...' एकापाठोपाठ एक तीन रुममेट्सची आत्महत्या, कारण काय?
तृणमूलचे एकूण किती खासदार होते? किती जणांनी केली बंडखोरी?
लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे एकूण 28 खासदार आहेत. असंतुष्ट गटाचा असा दावा आहे की, त्यांच्याकडे दोन-तृतीयांश खासदारांचे समर्थन असून ते संसदेत स्वतःला वेगळ्या गटाच्या स्वरूपात मान्यता मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, जर सुदीप बंद्योपाध्याय यांनीही या बंडाला साथ दिली, तर बंडखोर खासदारांची संख्या 20 पर्यंत पोहोचू शकते. पक्षातील या वाढत्या असंतोषाचा परिणाम केवळ दिल्लीपुरता मर्यादित नसून, पश्चिम बंगालच्या राजकारणातही त्याचे पडसाद उमटत आहेत. अनेक आमदारही या असंतुष्ट गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वापुढील पेच अधिकच कठीण झाला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत नेतृत्वात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने ही बंडाळी शमवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, परंतु दिल्लीत होणाऱ्या संभाव्य बैठकांमुळे पक्षाचे भविष्य काय असेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एका बाजूला पक्षाची एकजूट टिकवून ठेवण्याचे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला वाढत्या बंडाळीची शक्यता यामुळे तृणमूल काँग्रेस सध्या एका मोठ्या राजकीय संकटातून जात आहे. आगामी काळात ही परिस्थिती कशी हाताळली जाते, यावरच पक्षाची पुढील दिशा आणि आगामी राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत.
ADVERTISEMENT











