Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि भाजप नेत्यांवर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे. सरकारने गोरगरिबांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी प्रामाणिकपणे केली पाहिजे, त्यात कट-कारस्थान करून ते रद्द करण्याचा डाव आखू नये, असा गंभीर आरोप त्यांनी केला. लाखो-करोडो मराठा बांधवांनी संघटित होऊन आणि संघर्ष करून मिळवलेले हक्काचे कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण एकीकडे द्यायचे आणि दुसरीकडे छुप्या मार्गाने ते रद्द करायचा घाट घालायचा, ही अत्यंत नीचपणाची वागणूक आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT
बड्या नेत्यांचा कटात सहभाग
आपल्या वक्तव्यात मनोज जरांगे पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट निशाणा साधला. मराठा समाजाच्या 60-70 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही मंत्र्याने किंवा नेत्याने ओबीसींचे आरक्षण अथवा नोंदी रद्द करा, असे पत्र दिल्याचा पुरावा दाखवावा, असे आव्हान त्यांनी दिले. बावनकुळे यांनी मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्यासाठी पत्र काढल्याचा खळबळजनक आरोप करत, हे कृत्य गोरगरीब ओबीसी समाजाला तरी मान्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याशिवाय बीड जिल्ह्यातील बड्या नेत्यांचा आणि काही अधिकाऱ्यांचा कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याच्या कटात सहभाग असल्याचा दावाही त्यांनी केला.
हे ही वाचा : राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूला ताटकळत ठेवल्याची चर्चा, आता राज ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
29 ऑगस्ट रोजी आंदोलन
जात पडताळणी समितीच्या आणि मंत्र्यांच्या हस्तक्षेपावर भाष्य करताना जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षातील मराठा आमदार, खासदार व जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून ही चूक त्वरित दुरुस्त करावी. कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचा घेतलेला निर्णय मागे न घेतल्यास आगामी काळात सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. तसेच या अन्यायाविरोधात येत्या 29 ऑगस्ट रोजी आंदोलन उभारण्यात येईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
हे ही वाचा : वाशीम : जवानाने गरोदर पत्नीला क्रूरपणे संपवलं, मेहुण्याकडून अनैतिक संबंध असल्याचे आरोप
भाजपला इशारा
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी नारको टेस्टची तयारी दर्शवल्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना, 15 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात तो विषय होता, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. मात्र, पत्र काढण्याच्या आणि गंगाखेड येथील हस्तक्षेप प्रकरणातून बावनकुळे दोषमुक्त होत नाहीत, असे सांगत त्यांनी भाजपला निवडणुकीत उमेदवार पाडण्याचा उघड इशारा दिला. दुसरीकडे मंगेश ससाणे यांनीही भाजपच्या काळातच ओबीसींचे राजकीय व शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप केल्याने, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावरून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
ADVERTISEMENT











