Crime News : काही दिवसांपूर्वी बिहारमधील रवी कुमार याचा गुजरातमधील वडोदरा येथे रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला होता. यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. रवीच्या मृत्यूनंतर त्याच्या जवळच्या दोन मित्रांनी कथितरित्या आत्महत्या केली आहे. या घटनेने केवळ पोलीसच नव्हे तर कुटुंबियांनाही कोड्यात टाकले आहे. या 'ट्रिपल सुसाइड'मागे हनीट्रॅप आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या ब्लॅकमेलिंगची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT
बायकोचे दागिने नेले
मिळालेल्या माहितीनुसार, रवी गेल्या सहा वर्षांपासून गुजरातमधील वडोदरा येथील एका खासगी कंपनीत कार्यरत होता. दहा दिवसांपूर्वीच तो घरून कामावर परतला होता. मृत रवीच्या वडिलांनी खळबळजनक दावा केला आहे की, रवी जाताना त्याच्या पत्नीचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे कडे घरच्यांना न सांगता सोबत घेऊन गेला होता. ही बाब नंतर समोर आल्याने रवी कोणत्या तरी मोठ्या दबावाखाली किंवा आर्थिक विवंचनेत होता का, असा संशय बळावला आहे. या घटनेमागे कोणीतरी त्याला आणि त्याच्या मित्रांना ब्लॅकमेल करत असल्याचे वडिलांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा : 25 महिलांशी लग्न केले, 33 तोळे सोने अन् बरंच मोठं कांड
'माझा मित्र गेला, मी सुद्धा वाचणार नाही'
मृत्यूचे हे सत्र अत्यंत अनाकलनीय आहे. रवीचा जवळचा मित्र रोहित हा देखील वडोदरा येथे जाणार होता, मात्र रवी तिथे पोहोचताच रोहितने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या बातमीने खचलेल्या रवीने आपल्या आईला फोनवर सांगितले होते की, "माझ्या मित्राचा मृत्यू झालाय, आता मी सुद्धा वाचणार नाही." त्यानंतर काही दिवसांतच वडोदरा येथील मकरपुरा रेल्वे स्थानकाजवळ रवीने मालगाडीसमोर उडी मारून जीवन संपवले. धक्कादायक म्हणजे, रवीच्या मृत्यूची बातमी त्याच्या रुममध्ये सोबत राहणारा विकास कुमार (उत्तर प्रदेश) याला समजल्यानंतर त्यानेही गळफास लावून आत्महत्या केली.
हे ही वाचा : नवऱ्याला प्रेमाने खीर खाऊ घातली अन् प्रियकर आला, पुढं घडलं नको तेच
अनेक वर्षांपासून रहायचे एकत्र
एकापाठोपाठ झालेल्या या तीन मित्रांच्या मृत्यूमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. हे तिन्ही मित्र अनेक वर्षांपासून एकत्र राहत होते आणि अनेकदा रवीच्या गावी येत असत. इतक्या घनिष्ठ मित्रांनी एकामागून एक आत्महत्येचे पाऊल उचलल्याने यामागे एखाद्या संघटित हनीट्रॅप टोळीचा हात असावा, असा संशय व्यक्त होत आहे. रवी विवाहित असून त्याला एक लहान मुलगी आहे. अद्याप पोलिसांनी हनीट्रॅपच्या शक्यतेला अधिकृत दुजोरा दिलेला नसला तरी, या गूढ मृत्यूंच्या कारणांचा तपास आता एका मोठ्या गुन्हेगारी कटाच्या दिशेने वळला आहे.
ADVERTISEMENT











