Maharashtra violence : अमरावतीत पुन्हा हिसेंचा भडका; दगडफेक-जाळपोळ, संचारबंदी लागू

मुंबई तक

• 08:00 AM • 13 Nov 2021

महाराष्ट्रातील अमरावती, मालेगाव आणि नांदेडमधील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. त्रिपुरातील घटनेच्या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या असून, महाराष्ट्रातील तीन शहरांमध्ये हिसेंचा उद्रेक झाला. दरम्यान, अमरावतीत आजही (13 नोव्हेंबर) हिंसक घटना घडल्या असून, दगडफेक, तोडफोड करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्रिपुरातील हिंसचाराच्या विरोधात शुक्रवारी भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. या बंद दरम्यान, महाराष्ट्रातील मालेगाव, अमरावती […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रातील अमरावती, मालेगाव आणि नांदेडमधील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. त्रिपुरातील घटनेच्या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या असून, महाराष्ट्रातील तीन शहरांमध्ये हिसेंचा उद्रेक झाला. दरम्यान, अमरावतीत आजही (13 नोव्हेंबर) हिंसक घटना घडल्या असून, दगडफेक, तोडफोड करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

हे वाचलं का?

त्रिपुरातील हिंसचाराच्या विरोधात शुक्रवारी भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. या बंद दरम्यान, महाराष्ट्रातील मालेगाव, अमरावती आणि नांदेडात हिंसाचाराचा उद्रेक झाला. नांदेड, अमरावती, मालेगावात जमावाने दुकानांची आणि सार्वजनिक मालमत्तांची तोडफोड केली. त्यामुळे तिन्ही शहरात तणाव पसरला आहे.

अमरावतीत मुस्लिम समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण, दुकानांची तोडफोड आणि दगडफेक

अमरावतीत शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराचे शनिवारीही पडसाद उमटले. जमावाकडून करण्यात आलेल्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी भाजपाकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. यावेळी शहरातील राजकमल चौकात दोन्ही बाजूचे जमाव आमने-सामने आला. यावेळी अनियंत्रित झालेल्या दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली.

अचानक दगडफेक सुरु झाल्यानंतर दोन्हीकडील जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याचबरोबर अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. मात्र, या धुमश्चक्रीत समाजकंटकांनी काही दुकानं पेटवून दिली. सध्या अमरावतीतील परिस्थिती नियंत्रणात आली असून, वातावरण तणावपूर्ण आहे.

अमरावतीत कलम 144; पालकमंत्र्यांकडून शांतता पाळण्याचं आवाहन

सलग दुसऱ्या दिवशी दगडफेक, जाळपोळीसह हिंसक घटना घडल्यानं अमरावतीत आता कलम 144 लागू करण्यात आलं आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही नागरिकांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे.

‘अमरावतीतील परिस्थिती नियंत्रणाखाली येत आहे. माझी सर्व अमरावतीकरांना विनंती आहे, त्यांनी शांतता आणि संयम पाळावा. माध्यमांनीही दूरचित्रवाणीवर अप्रिय घटनांची दृश्ये दाखवताना त्यावर वेळ नमूद करावी, जेणेकरून लोकांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं’, असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

‘परिस्थिती चिघळेल अशी प्रक्षोभक वक्तव्ये किंवा सोशल मिडीया पोस्ट कोणीही करू नयेत. अमरावती हे औद्योगिक शहर आहे, या जिल्हाला मोठा सांस्कृतिक-सामाजिक वारसा आहे. अमरावतीच्या लौकिकाला गालबोट लागेल याची काळजी आपण सर्व जण घेऊया,’ असंही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp