दीपक सुर्यवंशी :
ADVERTISEMENT
कोल्हापूर : आगामी निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढविणार आहे. त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांना यात चांगलेच धक्के बसतील, असा दावा पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. ते आज कोल्हापूरमध्ये सर्किट हाऊस इथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी इतरही मुद्द्यांवर भाष्य केलं. राज ठाकरे सध्या कोल्हापूर आणि कोकणच्या दौऱ्यावर आहेत.
राज ठाकरे पाच वर्षांनंतर कोल्हापूरमध्ये :
तब्बल 5 वर्षांच्या कालखंडानंतर राज ठाकरे आज कोल्हापूरमध्ये दाखल झाले. त्यावेळी तावडे हॉटेल परिसरात त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहावर कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीपूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे काय म्हणाले?
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. आजपर्यंतच्या आपला राजकीय अनुभव पाहता मनसेमुळे प्रत्येक निवडणुकीत प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व पक्षांना हादरे बसले आहेत. यावेळीसुद्धा याच घटनेची पुनरावृत्ती होईल, असं वाटतं. मुंबई महापालिकेची निवडणूक मनसे स्वबळावर लढवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
मनसे-शिंदे-भाजप जवळीकतेवर उत्तर :
मनसेच्या शिंदे गट आणि भाजपशी वाढलेल्या जवळीकतेवर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, शिंदे-फडणवीस गटाशी जुळवून घेत आहे, अशी टीका आपल्यावर केली जाते. त्यातून आरोपही केले जातात. पण या आरोपांची नव्हे, तर आपल्या पक्षाची आपण चिंता करतो. महाराष्ट्रासाठी काम करणं हेच आपलं कर्तव्य आहे, असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराव बोम्मई यांनी सांगली, सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर हक्क सांगितल्यानं, सीमाप्रश्न नव्यानं पेटला आहे. याबद्दल विचारता, राज ठाकरे यांनी हा सीमाप्रश्न आताच अचानकपणे कसा काय उद्भवलाय, असा प्रतिप्रश्न करत, मुख्य विषयावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठीच हे केलं जातं असल्याची टीका त्यांनी केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आजवर केलेल्या वादग्रस्त विधानांवरही राज ठाकरे यांनी टीका केली. राजकारणात काही व्यक्तींना पदं मिळतात. पण त्या पदांची पोच मात्र येत नाही, असा टोला त्यांनी राज्यपालांना लगावला.
हर हर महादेव… सारख्या चित्रपटांना विरोध करण्याऱ्यांनी आधी निर्माता-दिग्दर्शकांशी तसंच इतिहास लेखकांशी चर्चा करायला हवी होती, असंही राज ठाकरे म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत कधीही जाती-पातीचं राजकारण झालं नाही. आता मात्र केवळ आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी काही जण जातीद्वेष हेतूपूर्वक निर्माण करत आहेत, अशी टिप्पणीही यावेळी त्यांनी केली.
ADVERTISEMENT