सोमय्या पितापुत्राच्या अडचणी वाढणार?; आयएनएस विक्रांत निधी प्रकरणात पोलिसांचं समन्स

भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या आणखी आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी संकलन प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून, आता मुंबई पोलिसांकडून सोमय्या पितापुत्राची चौकशी केली जाणार आहे. मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावलं आहे. नौदलाची मोडीत निघालेली आयएनएस विक्रांत ही […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:33 PM • 08 Apr 2022

follow google news

भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या आणखी आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी संकलन प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून, आता मुंबई पोलिसांकडून सोमय्या पितापुत्राची चौकशी केली जाणार आहे. मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावलं आहे.

हे वाचलं का?

नौदलाची मोडीत निघालेली आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी पैसे गोळा केले होते आणि हे पैसे राजभवनाकडे न देता निवडणुकीच्या प्रचारात आणि मुलाच्या कंपनीत वापरल्याचा आरोप राऊतांनी केलेला आहे. या आरोपानंतर किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी सैनिक बबन भोसले यांनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी कलम ४२०, ४०६, ३४ अंतर्गत किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्याविरूद्ध गुरुवारी (७ एप्रिल) गुन्हा दाखल केला. या प्रकरणात ट्रॉम्बे पोलिसांकडून किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांची चौकशी केली जाणार आहे. मुंबई पोलिसांकडून तसं समन्स बजावण्यात आलं आहे. उद्या (९ एप्रिल) सकाळी ११ वाजता चौकशीसाठी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे नोटिशीमध्ये म्हटलेलं आहे.

राऊतांनी काय केले आहेत आरोप?

संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सोमय्यांवर आयएनएस विक्रांतच्या नावाखाली जमा केलेले पैसे हडप केल्याचा आरोप केला होता. “”विक्रांत वाचवा म्हणून ते डबे फिरवायला लागले. त्या काळात त्यांना महाराष्ट्रातील लाखो करोडो लोकांनी पैसे दिले. माझ्या माहितीप्रमाणे किरीट सोमैय्या यांनी ‘सेव्ह विक्रात’च्या नावाखाली कोट्यवधी रुपये गोळा केले. ही रक्कम ५७ ते ५८ कोटी रुपये होती. मला हे त्यांच्याच एका जवळच्या माणसाने सांगितलं. ५७-५८ कोटी रुपये. महात्मा किरीट सोमैय्या यांच्या मुलाखती मी वाचल्या. त्यांनी सरकारवर प्रचंड टीका करून, या सरकारमध्ये राष्ट्रीय भावना, देशभक्ती नाही, त्यामुळे आम्ही २०० कोटी रुपये गोळा करून ते राजभवनात जमा करू असं सांगितलं होतं,” असं राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.

“आता राज्यपालांच्या कार्यालयातून माझ्याकडे पत्र आलं आहे. धीरेंद्र उपाध्याय नावाचे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. त्यांनी राज्यपालांना याबद्दल विचारलं. २०१३-१४, २०१४-२०१५ या काळात विक्रांतसाठी अशा पद्धतीने पैसे गोळा करण्यात आले होते. ते तुमच्याकडे जमा झाले आहेत का? राज्यपाल कार्यालयाचं पत्र आहे की, असा कोणताही निधी कार्यालयात जमा केला गेलेला नाही. ही रक्कम राजभवनात जमा झालेली नसेल, तर ही रक्कम कुठे गेलीये? ही रक्कम कुणाच्या घशात आणि खिशात गेलीये? ही रक्कम भाजपने निवडणुकीत वापरली का? किरीट सोमैय्यांच्या कंपनीत वापरण्यात आली का?, हा माझा सवाल आहे,” असं राऊत म्हणालेले आहेत.