गढूळ झालेल्या सामाजिक वातावरणातही धर्मभेदाची भिंत ओलांडून ‘ती’ ने वाचवला जीव

– ज़का खान, बुलडाणा प्रतिनिधी मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसेचा वाद आणि अशा अनेक गोष्टींवरुन सध्या राज्यातलं राजकारण चांगलंच तापलेलं आहे. या मुद्द्यांमुळे सध्या समाजात तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती तयार झाली आहे. परंतू तळहातावर पोट असणाऱ्या व्यक्तींना धर्माशी आणि या गोष्टींशी काहीही घेणंदेणं नसंत. संकटकाळात हीच लोकं आपली जात-पात, धर्म-पंथ या सर्व गोष्टी मागे सोडून […]

Mumbai Tak

मुंबई तक

15 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:08 AM)

follow google news

– ज़का खान, बुलडाणा प्रतिनिधी

हे वाचलं का?

मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसेचा वाद आणि अशा अनेक गोष्टींवरुन सध्या राज्यातलं राजकारण चांगलंच तापलेलं आहे. या मुद्द्यांमुळे सध्या समाजात तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती तयार झाली आहे. परंतू तळहातावर पोट असणाऱ्या व्यक्तींना धर्माशी आणि या गोष्टींशी काहीही घेणंदेणं नसंत. संकटकाळात हीच लोकं आपली जात-पात, धर्म-पंथ या सर्व गोष्टी मागे सोडून समोरच्या व्यक्तीला मदत करण्यासाठी धावून पुढे येतात.

क्रांतीवीर सिनेमात नाना पाटेकर यांच्या तोंडात, “ये मुसलमान का खून, ये हिंदू का खून, बता इस मे कोनसा हिंदू का, और कोनसा मुसलमान का, बनानेवाले ने इसमे फरक नही किया, तो तू कोन होता है इस्मे फरक करने वाला”, हा डायलॉग सर्वांनी ऐकला आहे. बुलडाण्यात याचं जिवंत उदाहरण पहायला मिळालं.

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात सविता इंगळे या महिलेवर शस्त्रक्रीया होणार होती. सविता इंगळे यांचे वडील रामराव बोर्डे हे मुंबईतील भांडूप भागात मासेविक्रीचा व्यवसाय करतात. काही महिन्यांपूर्वीच ते बुलडाणा शहरात आले होते. रामराव यांची मुलगी सविताला गर्भपिशवीचा आजार होता. शस्त्रक्रीयेदरम्यान रुग्णालयाने संगीता यांच्यासाठी ओ निगेटीव्ह रक्ताची गरज भासू शकते असं सांगितलं. ओ निगेटीव्ह हा रक्तगट फार दुर्मिळ असल्यामुळे रामराव यांना यासाठी शोधाशोध करावी लागली.

जिल्हा रुग्णालयात ओ-निगेटीव्ह रक्ताची गरज असल्याची माहिती मिर्झा नगर भागात राहणाऱ्या फारुख शेख यांना मिळाली. फारुख शेख यांचा रक्तगट ओ निगेटीव्ह होता. परंतू काही दिवसांपूर्वीच त्यांनी रक्तदान केल्यामुळे त्यांनी आपली बहीण राहत अंजुम शेख हिला रक्तदान करण्याची विनंती केली. राहत यांनीही क्षणाचाही विचार न करता रक्तदान करत सवीता इंगळे यांच्या शस्त्रक्रीयेसाठी मदत केली.

आजही राज्यासह देशामध्ये धार्मिक राजकारण सुरू असल्याचे दिसून येते, परंतु त्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त समाज एकत्र जोडून ठेवण्याचे सकारात्मक विचार देखील समाजात आहेत, याची प्रचिती या उदाहरणावरून दिसून येते…आणि कुठल्याही दोन समाजाचे नव्हे तर सर्व मानवजातीचे रक्ताचे नाते आहे, असेच म्हणावे लागेल.

    follow whatsapp