‘मिशन बारामती’ दगडावर डोकं आपटण्यासारखं; उगाचं वेळ वाया घालवू नका : भुजबळांचा भाजपला सल्ला

मुंबई तक

09 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:47 AM)

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पराभूत करुन बारामतीचा किल्ला आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून मायक्रो प्लॅनिंग करण्यात येत आहे. याच प्लॅनिंगचा भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या 22, 23 व 24 सप्टेंबर रोजी त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे […]

Mumbaitak
follow google news

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पराभूत करुन बारामतीचा किल्ला आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून मायक्रो प्लॅनिंग करण्यात येत आहे. याच प्लॅनिंगचा भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या 22, 23 व 24 सप्टेंबर रोजी त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नुकताच या मतदारसंघाचा दौैरा करुन आढावा घेतला.

हे वाचलं का?

दरम्यान, भाजपच्या मिशन बारामतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. ते माझगांवमध्ये बोलत होते. भुजबळ म्हणाले, भाजपचं मिशन म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे, पण त्याचा उपयोग होणार नाही, आपला वेळ व्यर्थ घालवू नका. बारामती जिंकण्याचा प्रयत्न म्हणजे भाजप वेळ वाया घालवत आहे. त्यापेक्षा दुसऱ्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावं, असा सल्लाही भुजबळ यांनी भाजपला दिला.

छगन भुजबळ आज माझगाव येथील अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सहकुटुंब सहभागी झाले. मागच्या 35 वर्षांपासून ते या मंडळाचे अध्यक्ष आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत भुजबळ म्हणाले की माझं बालपण याच अंजीरवाडीत गेलं. तेव्हापासून बाप्पांची सेवा करत आहे. त्यासोबत यंदाच्या गणेशोत्सवावर भाष्य करताना भुजबळ म्हणाले, सत्ता असो अगर नसो आम्हाला परवा नाही. हिंदू सरांवरचे विघ्न टळले म्हणणाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारावे की त्यांनी कोरोनात लॉक डाऊन का लावला.

आमदार राम शिंदेंच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी राम शिंदेंच्या खांद्यावर देण्यात आली आहे. ”बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपनं लक्ष केंद्रीत केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक जिंकायचीच त्यामुळे आम्ही तयारी करत आहोत. 2014 आणि 2019 ची निवडणुक आम्ही हरलो. 2024 चा उमेदवार ठरवायचा आहे. 2014 ते 2024 या काळात प्रचंड बदल झाला आहे. जर आम्ही अमेठी जिंकू शकतो तर बारामतीही जिंकू शकतो. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी वायनाड सारखा मतदार संघ शोधावा.” असं सल्ला राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला होता.

निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यावर अजित पवार काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री निर्मला सितारमन यांना बारातमी लोकसभेची जबाबदारी दिल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना माजी उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार म्हणाले ”अमुक अमुक जण बारामतीला येणार आहेत, तुम्हचं काय म्हणणं आहे. अरे येऊदे ना बारामतीला, बारामती काय अजित पवारच्या बापाची आहे का? ती सर्वाची आहे.

उद्या तुम्हाला ही वाटलं तर तुम्ही पण येणार ना आणि आलेल्यांचे स्वागत करणं ही आपली परंपरा आहे. त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे. कोणी नेते महाराष्ट्रात आले येऊद्या त्यांचा अधिकार आहे. आम्ही कधी दुसऱ्या राज्यात गेलो तर ते म्हणतात का अजित पवार इकडे कशाला आले. म्हणुन पत्रकारांना माझी हात जोडुन विनंती आहे तुम्हाला काही दाखवायला नसेल तर असले काही दाखवू नका” असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांना खडसावलं होतं.

    follow whatsapp