अकलूज : जुळ्या बहिणींशी लग्न करणारा नवरदेव संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच अडचणीत आला आहे. नवरा मुलगा अतुल उत्तम आवताडे याच्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 494 नुसार NCR दाखल केला आहे. याप्रकरणी माळेवाडी येथील राहुल भारत फुले यांनी तक्रार नोंदविली होती.
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण?
अतुल उत्तम आवताडे (रा. महाळुंग, गट नं-२) या तरुणाने एकाच वेळी दोन मुलींशी लग्न केल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील कांदिवली येथील रिंकी व पिंकी या दोन मुलींशी अतुलने लग्नगाठ बांधली. शुक्रवारी (3 डिसेंबर) दुपारी हॉटेल गलांडे येथे हा विवाह सोहळा संपन्न झाला. यानंतर विवाहाचे फोटो आणि चित्रीकरण सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दोन्ही बहिणींनी एकाच तरुणासोबत का केला विवाह? अतुल त्यांच्या आयुष्यात कसा आला?
रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणी आहेत. जुळ्या असल्यानं त्यांचं एकमेकींशी घट्ट नातं आहे. दोघी इतक्या एकमेकीत गुंतलेल्या की एकीला त्रास झाला, तर दुसरीला त्रास, अशी दोघींची स्थिती. बालपणापासून दोघींच्या आवडीनिवडीही एकसारख्याच. शिक्षण एकत्रित करुन आयटी इंजिनिअर झाल्यानंतर एकाच आयटी कंपनीत नोकरीला लागल्या. वडिलांचं छत्र हरवल्यानंतर दोघीही आईसोबत राहतात.
सहा महिन्यांपूर्वी रिंकी, पिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्यानंतर अतुल या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने तिघींना रुग्णालयात दाखल केले. कुटुंबात पुरुष नसल्याने माणुसकीच्या नात्यानं अतुलनं तिघींची दिवस-रात्र सेवा केली. तिघींना अतुलविषयी आपुलकी निर्माण होऊन यातूनच जुळ्या बहिणीतील एकीचे त्याच्यावर प्रेम जडले. दोन्ही बहिणी एकमेकींना सोडून कधीच राहिलेल्या नाही. वेगळं होणं दोघींना अशक्य झाल्यानं त्यांनी अतुलशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. रिंकी, पिंकीच्या आईनेही अतुलसोबत एकत्रित विवाह करायला संमती दिली.
ADVERTISEMENT
