Mumbai Police : देवेन भारती यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात

मुंबई तक

04 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:26 AM)

मुंबई : पोलिसांच्या आजवरच्या इतिहासातील एक मोठा बदल घडवून आला आहे. मुंबई पोलीस दलात आता विशेष पोलीस आयुक्तपद निर्माण करण्यात आलं आहे. या पदावर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले समजले जाणारे वरिष्ठ अधिकारी देवेन भारती (IPS Deven Bharti) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज दुपारी जारी करण्यात आले. नवीन रचनेनुसार, मुंबईतील पाच […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : पोलिसांच्या आजवरच्या इतिहासातील एक मोठा बदल घडवून आला आहे. मुंबई पोलीस दलात आता विशेष पोलीस आयुक्तपद निर्माण करण्यात आलं आहे. या पदावर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले समजले जाणारे वरिष्ठ अधिकारी देवेन भारती (IPS Deven Bharti) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज दुपारी जारी करण्यात आले.

हे वाचलं का?

नवीन रचनेनुसार, मुंबईतील पाच सहआयुक्त (गुन्हे, कायदा आणि सुव्यवस्था, वाहतूक, प्रशासन आणि आर्थिक गुन्हे शाखा) हे विशेष पोलीस आयुक्तांना उत्तरदायी असणार आहेत. तर विशेष पोलीस आयुक्त हे पोलीस आयुक्त यांना उत्तरदायी राहणार आहेत. मुंबई पोलीस दलात विशेष पद तयार करुन त्यावर देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी देवेंद्र फडणवीस हे मागील काही दिवसांपासूनच अनुकूल असल्याचं बोललं जात होतं. अखेर या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं आहे.

मात्र याच नियुक्तीवरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने निशाणा साधला आहे. ट्विट करत काँग्रेनं म्हटलं आहे की, आता मुंबईला जसा एका पोलीस आयुक्तासोबत सोबत दुसरा विशेष पोलीस आयुक्त नेमत आहात, तसाचं राज्यासाठी विशेष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही नेमून टाका, म्हणजे विषयच संपून जाईल. महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेचा सत्यानाश करण्याचा चंगच शिंदे-फडणवीसांनी बांधला आहे.

तर पोलीस आयुक्त CM शिंदेंचे अन् विषेश आयुक्त फडणवीसांचे असा संदेश गेला असल्याचं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं. ते म्हणाले, मुंबई पोलीस दलात आयुक्त हेच सर्वोच्च पद असताना विशेष पोलीस आयुक्त नेमून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्वतःची वेगळी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

आपल्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी शिस्तीचा प्रशासकीय विभाग असलेल्या पोलीस दलात मोडतोड करून विशेष पोलीस आयुक्त नियुक्त करणं चुकीचं आहे, अशी विशेष नेमणुक करून देवेंद्र फडणवीस हे स्वतःची समांतर प्रशासन चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, असाही आरोप लोंढे यांनी केला.

पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या देवेंद्र फडणवीस यांना शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद भूषवणे रुचले नाही. सत्ता स्थापन होताच त्यांनी लगेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा दर्जा बरोबर करण्यासाठी दोन वेगळ्या वॉर रुम काढल्या. आता शिस्तीचं खातं असलेल्या पोलिस विभागाचं एक प्रकारे विभाजन करण्याचे काम सुरु केलं आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त बदलता येत नाहीत किंवा काही अडचणी असतील म्हणून विशेष पोलीस आयुक्तपद निर्माण करून देवेन भारती यांची त्यावर नेमणूक करण्यात आली. या नेमणुकीमुळे पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांचा तर विशेष पोलीस आयुक्त उपमुख्यमंत्र्यांचा असा संदेश गेला आहे. आपल्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी प्रशासनाची अशी मोडतोड केली आहे.

असेच असेल तर आता प्रत्येक जिल्ह्यालाही विशेष जिल्हाधिकारी, विशेष जिल्हा पोलीस अधिक्षक, विशेष तहसिलदार, विशेष नायब तहसिलदार अशी वरपासून खालीपर्यंत विशेष पदांची निर्मिती करून दोन सत्ता केंद्रे तयार करा, एक शिंदे गट आणि दुसरे भाजपाला असं वाटून घ्या आणि प्रशासकीय यंत्रणेचा बट्टयाबोळ करा खोचक सल्ला लोंढे यांनी दिला.

    follow whatsapp