1 मार्चपासून देशभरात वयोवृद्धांसाठीच्या लसीकरणाला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी महाराष्ट्रातही चार हजारांपेक्षा अधिक जणांना लस दिली गेली. मात्र महाराष्ट्रातल्या अनेक भागात आजच्या दुस-या दिवशीही निरनिराळ्या कारणांमुळे लसीकरणात अडथळे येत असल्याचं चित्र होतं.
ADVERTISEMENT
नवी मुंबई: मुळात कोविनमधील तांत्रिक बिघाडामुळे लसीकरणात दिरंगाई होत होतीच. त्यात नवी मुंबईत हॉस्पिटल्समध्ये लशीच पोहोचल्या नसल्याने लशीच्या चौकशीसाठी आलेल्यांच्या पदरी निराशा पडली. त्यावर डॉक्टरांशी संवाद साधला असता, ‘तांत्रिक अडचणींमुळे अडथळे येत आहेत, दोन दिवसांत लसीकरण सुरू होईल’, असं उत्तर मंगल प्रभू हॉस्पिटलच्या डॉ. प्रकाश गोडे यांच्याकडून मिळालं.
मुंबई: मुंबईतल्या बीकेसी लसीकरण केंद्रात लसीकरणासाठी लांबच लांब रांग असल्याचं चित्र होतं. कडाक्याच्या उन्हात वयोवृद्धांना तात्कळत थांबावं लागलं. सकाळी लवकर आलेले अनेक जण दुपार झाली तरी लशीच्या प्रतिक्षेतच होते. त्यामुळे, इथलं नियोजन योग्य नाही, पोलिसांनाही स्थिती हाताळता येत नसल्याची तक्रार नागरिक करत होते.
नागपूर: नागपुरातही कोविनमधील तांत्रिक बिघाडामुळे वयोवृद्धांना थांबावं लागल्याचं चित्र होतं. तांत्रिक बिघाडामुळे नोंदणी होत नाही, नोंदणी झाली तरी हॉस्पिटलमधल्या ढिसाळ कारभारामुळे वृद्ध थांबून होते. त्यामुळे ही सगळी स्थिती पाहता महाराष्ट्रातला हा गोंधळ थांबणार कधी? असाच सवाल उपस्थित केला जातोय.
ADVERTISEMENT
