राज्यसभा निवडणूक: आमदार आव्हाड-ठाकूर-कांदे खरंच चुकले?, भाजप म्हणतं हो-हो!

ऋत्विक भालेकर

• 03:34 PM • 10 Jun 2022

मुंबई: महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत एक मोठी घडामोड घडली आहे. खरं तर वेळेआधीच विधानसभेच्या आमदारांनी या निवडणुकीसाठी मतदान पार पाडलं होतं. त्यामुळे वेळेत मतमोजणी सुरु होईल असा सगळ्यांचा अंदाज होता. मात्र, महाविकास आघाडीच्या तीन आमदारांची मतं बाद करावी अशी मागणी भाजपने अतिशय आग्रहाने लावून धरली आहे. आता हे तीन आमदार कोण आणि भाजपचा नेमका दावा काय […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत एक मोठी घडामोड घडली आहे. खरं तर वेळेआधीच विधानसभेच्या आमदारांनी या निवडणुकीसाठी मतदान पार पाडलं होतं. त्यामुळे वेळेत मतमोजणी सुरु होईल असा सगळ्यांचा अंदाज होता. मात्र, महाविकास आघाडीच्या तीन आमदारांची मतं बाद करावी अशी मागणी भाजपने अतिशय आग्रहाने लावून धरली आहे. आता हे तीन आमदार कोण आणि भाजपचा नेमका दावा काय हे आपण जाणून घेऊया सविस्तरपणे.

हे वाचलं का?

राज्यसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी चुकीच्या पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पाडली त्यामुळे त्यांचं मत बाद ठरवावं असा दावा भाजपने केला आहे.

दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे हे विधानभवनात मतदान करताना नेमके कुठे चुकले याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत भाजपने नेमका काय दावा केला आहे ते आपण पाहूयात.

भाजप नेते प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीच्या तीन आमदारांची मतं बाद का ठरविण्यात याविषयी भाजपचा काय दावा आहे स्पष्ट केलं.

प्रसाद लाड म्हणाले की, ‘भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांच्या निवडणुकीचे एजंट हे पराग अळवणी यांनी यशोमती ठाकूर यांनी मत टाकताना मतपत्रिका जी त्यांच्या इलेक्शन एजंटला दाखवायची असते ती मतपत्रिका त्यांनी इलेक्शन एजंटच्या हातात दिलं.’

‘त्याचप्रमाणे सुहास कांदे यांनी अशा अंतरावरुन मत दाखवलं की, जेणेकरुन दोन ठिकाणच्या म्हणजेच दोन पक्षाच्या एजंटला ते मत दिसेल. त्याच प्रमाणे अतुल सावे हे आमच्या अनिल बोंडेंचे इलेक्शन एजंट आहेत. त्यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीने मत टाकताना प्रतोदाच्या हातात मतपत्रिका दिली ते सुद्धा आक्षेपार्ह होतं.’ असा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे.

‘याबाबत लेखी तक्रार करुन ही तीन मतं बाद करावी अशी मागणी आमच्या दोन्ही पोलिंग एजंटने केली आहे. मला वाटतं की, 100 टक्के असा प्रकार करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे ही मतं बाद करावीत ही विनंती पराग अळवणी यांनी केली आहे. मला खात्री आहे की, हे मत बाद होईल.’ असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे.

राज्यसभा निवडणुकीत प्रचंड मोठा ‘Twist’, भाजपच्या ‘त्या’ पत्रामुळे मतमोजणीच थांबली!

‘जर या सरकारने रिटर्निंग ऑफिसरवर दबाव आणला तर आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत जाऊ. निश्चितपणे ही मतपत्रिका बाद होत नाही तोपर्यंत मतमोजणी सुरु केली जाणार नाही.’ असंही प्रसाद लाड म्हणाले.

महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे तक्रार

दुसरीकडे भाजपने महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर महाविकास आघाडीने देखील तात्काळ भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे त्यांचं मत बाद करण्याची तक्रार केली आहे. तसेच अपक्ष आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा विधानसभेत आणून देखील नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांचंही मत बाद करण्यात यावं अशी मागणी महाविकास आघाडीने देखील केली आहे.

    follow whatsapp