संजय राठोड मुख्यमंत्र्याच्या भेटीला वर्षा बंगल्यावर

वनमंत्री संजय राठोड हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर पोहचले आहेत. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर भाजपने काही गंभीर आरोप केले. काही वेळापूर्वीच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन पूजा चव्हाणची आत्महत्या आहे की खून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. पाहा याच विषयावरची लाईव्ह चर्चा पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारीला आत्महत्या केली. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:11 PM • 24 Feb 2021

follow google news

वनमंत्री संजय राठोड हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर पोहचले आहेत. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर भाजपने काही गंभीर आरोप केले. काही वेळापूर्वीच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन पूजा चव्हाणची आत्महत्या आहे की खून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली.

हे वाचलं का?

पाहा याच विषयावरची लाईव्ह चर्चा

पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारीला आत्महत्या केली. त्यानंतर काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या ज्यानंतर भाजपने सातत्याने या क्लिप्समधला एक आवाज संजय राठोड यांचाच आहे असा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. गेले १५ दिवस नॉट रिचेबल असलेले संजय राठोड हे पोहरादेवी या ठिकाणी मंगळवारी हजर झाले. त्यानंतर पूजा चव्हाणच्या मृत्यूविषयी दुःख व्यक्त करत त्यांनी या प्रकरणात माझी बदनामी केली जाते आहे असं म्हटलं. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही संजय राठोड हजर होते. या बैठकीनंतर ते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहचले आहेत.

संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर काय भाष्य केलं? पाहा व्हीडिओ

पोहरादेवी या ठिकाणी जेव्हा संजय राठोड मंगळवारी पोहचले तेव्हा त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. त्यांच्या समर्थनासाठी जी गर्दी झाली त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत. त्यांनी मंगळवारीच या सगळ्या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी असे निर्देश दिले. संजय राठोड हे जेव्हा पोहरादेवी या ठिकाणी आले होते तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्या समर्थकांची गर्दी झाली की गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

ही बातमी वाचलीत का?- संजय राठोडांनी हात झटकले, गर्दीतील 10 हजार जणांवर गुन्हा दाखल

संजय राठोड यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज झाले आहेत. पूजा चव्हाण प्रकरणात भाजपने सातत्याने संजय राठोड यांच्यावर आरोप केले आहेत. त्यानंतर संजय राठोड हे काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. मात्र संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणात माझी अकारण बदनामी केली जाते आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंनी काय आवाहन केलं होतं?

विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होतो आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा तसंच अधिकाधिक खबरदारी घ्या असं आवाहन केलं होतं. मात्र पोहरादेवी या वाशिममधल्या ठिकाणी सगळ्या नियमांचं उल्लंघन झालं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज आहेत.