पत्रा चाळ घोटाळ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. या संजय राऊत यांनी विरोधी पक्षांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी विरोधकांचे आभार मानले आहेत. माझ्या कठीण काळात तुम्ही सदनाच्या बाहेर आणि सदनाच्या आत आवाज उठवलात यासाठी मी तुमचे आभार मानतो असं संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांचाही उल्लेख या पत्रात आहे. रडायचं नाही तर जे योग्य आहे त्यासाठी लढायचं असं बाळासाहेब म्हणायचे त्याचाच उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी पत्रात?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या पत्रात यावर जोर दिला आहे, की कठीण प्रसंगातच हे कळतं की आपला खरा मित्र कोण आहे? आपले शुभचिंतक, हितचिंतक कोण हे अशाच प्रसंगांमध्ये कळतं असाही उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे. आपल्या पत्रात संजय राऊत यांनी केंद्र सरकारने माझ्या विरोधात राजकीय कट रचल्याचा आरोपही केला आहे. मात्र मी झुकणार नाही, जीव गेला तरी बेहत्तर असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ही माझी लढाई मी शेवटपर्यंत लढणार आहे कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही हेदेखील संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.
पत्रात संजय राऊत म्हणतात, वेळ आल्यावर आमचाच विजय होणार आहे. आमच्या विचारांचा विजय होणार आहे. त्यांनी हेदेखील म्हटलं आहे की मला ठाऊक आहे आत्ता गोष्टींना धीराने सामोरं जाण्याची गरज आहे. आमच्या विचारांचा विजय झाल्यानंतरच या देशाला योग्य दिशा मिळेल.
या पत्रात संजय राऊत यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचेही आभार मानले आहेत. पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संदर्भात ईडी तपास करत आहे. याच प्रकरणात ईडीने आता संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी प्रविण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंटमॅन असल्याचं ईडीने न्यायालयाला सांगितलं.
संजय राऊतांवर आरोप करतानाच ईडीने त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यावर मोठ्या प्रमाणात रकमा जमा झाल्याचं आढळून आल्याचा दावा कोर्टात केला. प्रविण राऊत यांच्याकडे पैसे आल्यानंतर ते वेगवेगळ्या व्यक्तीकरवी संजय राऊत यांना पोहोचवण्यात आले. सुरुवातीला १.०६ कोटी रुपये बँक खात्यावर पाठवण्यात आल्याचं आढळून आलं आहे. त्यानंतर १.१७ कोटी रुपये, आणि आता १.०८ कोटी रुपये पाठवण्यात आल्याचं ईडीने न्यायालयात सांगितलं.
ADVERTISEMENT