अनाथांसाठी आभाळाएवढं कार्य करणाऱ्या सिंधुताई!

मुंबई तक

• 05:27 PM • 04 Jan 2022

अनाथांसाठी जगणं हा त्यांचा श्वास होता. आज त्याच सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं आहे. त्यांनी अनाथांसाठी केलेलं कार्य हे आभाळाएवढं आहे. अनाथ मुलांसाठी त्यांनी आयुष्य वेचलं. मी सिंधुताई सपकाळ हा सिनेमाही त्यांच्या आयुष्यावर निघाला होता. भाषण केलं की रेशन मिळतं. भाषण देता येतं म्हणून मला अनाथ मुलांना जगवता आलं असं कायम सिंधुताई म्हणाल्या. जगण्याचे अनुभव […]

Mumbaitak
follow google news

अनाथांसाठी जगणं हा त्यांचा श्वास होता. आज त्याच सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं आहे. त्यांनी अनाथांसाठी केलेलं कार्य हे आभाळाएवढं आहे. अनाथ मुलांसाठी त्यांनी आयुष्य वेचलं. मी सिंधुताई सपकाळ हा सिनेमाही त्यांच्या आयुष्यावर निघाला होता. भाषण केलं की रेशन मिळतं. भाषण देता येतं म्हणून मला अनाथ मुलांना जगवता आलं असं कायम सिंधुताई म्हणाल्या. जगण्याचे अनुभव माई सांगत असत. त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन त्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळाली. फुलांसोबत काटेही सोसता आले पाहिजेत असंही त्या कायम म्हणायच्या.

हे वाचलं का?

वर्धा जंगल भागातील नवरगाव या गावी सिंधुताईंचा जन्म झाला. घरात नको असताना त्यांचा जन्म झाला होता म्हणून त्यांचं नाव चिंधी असं ठेवण्यात आलं. घरातल्या खडतर परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणही जेमतेम चौथीपर्यंत घेता आलं. मी हाफटाईम चौथी पास आहे असं त्या सांगत. मात्र बहिणाबाई, तुकारामांचे अभंग, सुरेश भट यांचं साहित्य या सगळ्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. त्यांचं वाचन दांडगं होतं. त्यामुळे शिक्षण चौथीपर्यंत झालं असलं तरीही त्यांचा व्यासंग मोठा होता. आयुष्यात संघर्षाच्या ठिणग्याच नशिबी आलेल्या सिंधुताईंनी त्यांचं आयुष्य अनाथ मुलांसाठी वेचलं.

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी सिंधुताई सपकाळ यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. 1994 मध्ये पुण्याजवळच्या पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात संस्था सुरू केली. त्यांनी त्यांची मुलगी ममताला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन मध्ये दाखल केलं आणि त्यांनी अनाथ, बेवारस मुलांना आधार दिला.

अनाथांची माय काळाच्या पडद्याड! सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन

येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.

सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या याप्रमाणे-

बाल निकेतन हडपसर, पुणे

सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा

अभिमान बाल भवन, वर्धा

गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)

ममता बाल सदन, सासवड

सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे

    follow whatsapp