Nashik Crime : दारुच्या नशेत असताना अट्टल गुन्हेगाराची हत्या, टोळीयुद्धातून प्रकार घडल्याचा अंदाज

मुंबई तक

• 09:49 AM • 22 Nov 2021

नाशिकच्या म्हसरुळ परिसरात सराईत गुन्हेगार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची रविवारी रात्री नऊ वाजल्याच्या दरम्यान हत्या करण्यात आली आहे. संशयित आरोपींनी तीक्ष्ण हत्यारांनी वार करत प्रवीण काकड याच्यावर वार केल्याचं कळतंय. टोळीयुद्धातून हा प्रकार घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण गणपत काकड (वय २८) हा रविवारी रात्री साडेआठ वाजल्याच्या सुमारास दारु पिण्यासाठी म्हसरुळ […]

Mumbaitak
follow google news

नाशिकच्या म्हसरुळ परिसरात सराईत गुन्हेगार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची रविवारी रात्री नऊ वाजल्याच्या दरम्यान हत्या करण्यात आली आहे. संशयित आरोपींनी तीक्ष्ण हत्यारांनी वार करत प्रवीण काकड याच्यावर वार केल्याचं कळतंय. टोळीयुद्धातून हा प्रकार घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण गणपत काकड (वय २८) हा रविवारी रात्री साडेआठ वाजल्याच्या सुमारास दारु पिण्यासाठी म्हसरुळ गावातील अमरधामच्या पुढील मोकळ्या जागेत बसला होता. याचदरम्यान त्याच्यावर चार ते पाच संशयितांनी तीक्ष्ण हत्यारांनी वार केले. या हल्ल्यात प्रवीणच्या डोक्यात आणि पोटावर मोठ्या प्रमाणात वार झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पंचनाम्यासाठी पाठवला आहे. प्रवीणसोबत असलेल्या एका मित्रालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हल्लेखोरांबद्दल चौकशी सुरु आहे.

प्रवीण काकड यांच्याविरोधात प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे,जबरी चोरी,दरोडा घालणे,प्राणघातक हत्यारे बाळगून दहशत निर्माण करणे यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. सप्टेंबर महिन्यात कारागृहातून जामीनावर बाहेर आला असता त्याने म्हसरूळ पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता . त्यानंतर नुकताच कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याच्या विरोधातील टोळीने त्याची हत्या केल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात आहे, याच दिशेने पोलीसही तपास करत आहेत.

म्हसरूळ गावातून आडगाव कडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर कायम शुकशुकाट असतो . याचाच फायदा घेत सराईत गुन्हेगार या परिसरात रात्रीच्या सुमारास दारू पिऊन धिंगाणा घालत असतात . याचा फटका पोलीस कर्मचाऱ्यांना देखील बसलेला आहे . असे असताना या पररिसरातील पोलिसांनी गस्त वाढवून गुन्हेगारांचा अड्डा उध्वस्त करणे गरजेचे होते . मात्र,या परिसरात गस्तच नसल्याने हत्या सारखी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे .याप्रकरणी आता पोलीस योग्य ती पावले उचलतील ही अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

    follow whatsapp