भारतात लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेचा वेगही चांगलाच मंदावला आहे. अशात सिरम इन्स्टिट्युटचे CEO अदर पूनावाला यांनी एक पत्रक काढलं आहे. या पत्रकामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. भारतातल्या नागरिकांचं लसीकरण दोन-तीन महिन्यांमध्ये होणं शक्य नाही असं या पत्रकाद्वारे पूनावाला यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही भारताल्या ज्या किंमतीत कोव्हिशिल्ड या लसींचा पुरवठा केला त्या दराने निर्यात केलेली नाही.
ADVERTISEMENT
18 ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण थांबलं, याला जबाबदार कोण?
आणखी काय म्हटलं आहे पत्रामध्ये?
भारतात जानेवारी 2021 या महिन्यापासून लसीकरण सुरू झालं. फ्रंटलाईन वर्कर्सचं लसीकरण सर्वात आधी करण्यात आलं. त्यावेळी जगातल्या इतर देशांमध्येही कोरोना वाढत होता. त्यामुळे त्यांच्याही देशातील जनतेचा विचार करून आम्ही लसी निर्यात केल्या. त्यामुळेच आज घडीला आपल्या संकट काळात इतर देश आपल्या देशाला मदत करत आहे. कोरोना व्हायरस हा काही देशांच्या सीमेपर्यंत मर्यादित नाही. त्यामुळे सगळ्या जगाचं लसीकरण होणं आवश्यक आहे. आपल्या देशाची लोकसंख्या अफाट आहे त्यामुळे आपल्या देशात 2-3 महिन्यात संपूर्ण लसीकरण होणं शक्य नाही. देशातील लसींची मागणी पाहता आम्ही पुरवठा वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहोत असंही या पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.
आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे लोकसंख्या जास्त असलेल्या दोन देशांना आम्ही लसी पुरवल्या आहेत. तरीही जास्त लोकसंख्या असलेल्या देशांचं लसीकरण काही कालावधीत पूर्ण होईल असं नाही. संपूर्ण जगाचं लसीकरण होण्यासाठी 2-3 वर्षांचा कालावधी लागू शकतो असंही यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांचे लसीच्या उत्पादनाबाबत दावे ठरत आहेत फोल?
अदर पूनावाला ज्या सिरमचे सीईओ आहेत त्या सिरम इन्स्टिट्युटची कोव्हिशिल्ड ही लस भारतात तयार होते आहे. भारतात तयार होणाऱ्या दोन प्रमुख लसींपैकी ती एक आहे. तरीही गेल्या काही दिवसांपासून भारताला मोठ्या प्रमाणावर लस तुटवडा भासतो आहे. अशात आता अदर पूनावाला यांचं हे पत्रक समोर आलं आहे.
आपल्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला अशात आता समाधानाची बाब ही म्हणावी लागेल की आपल्या देशात रूग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 85 टक्क्यांवर पोहचलं आहे. मागील चोवीस तासांमध्ये 4 लाख 22 हजार 346 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरी लाट सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर रूग्ण बरे झाले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
ADVERTISEMENT











