Aditya Thackeray :”शिंदे-फडणवीस यांचं सरकार घटनाबाह्य, दिल्लीतून आदेश घेणारं”

मुंबई तक

20 Jul 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:55 AM)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दोन लोकांचं सरकार घटनाबाह्य आहे. आदेश घ्यायला दिल्लीत बसलं आहे. आपल्या महत्त्वकांक्षेसाठी त्यांनी हे राजकारण केलं आहे असं शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या आग्रीपाडा या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आदित्य ठाकरेंचा भाजप आणि एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप भाजपकडून […]

Mumbaitak
follow google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दोन लोकांचं सरकार घटनाबाह्य आहे. आदेश घ्यायला दिल्लीत बसलं आहे. आपल्या महत्त्वकांक्षेसाठी त्यांनी हे राजकारण केलं आहे असं शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या आग्रीपाडा या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे वाचलं का?

आदित्य ठाकरेंचा भाजप आणि एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

भाजपकडून ठाकरे परिवार आणि शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सत्ता नाट्याला एक महिना पूर्ण होतोय. मात्र राग येण्यापेक्षा वाईट वाटतं आहे. ज्यांना आम्ही भरभरून दिलं त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. आम्ही कुणाचंही वाईट केलं नाही म्हणून आज आम्ही ताठ मानेनं उभे आहोत. गेलेले लोक लपून छपून शिवसैनिकांना त्रास देत आहेत. ज्यांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. लाज वाटत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा. दोन लोकांचं हे सरकार पडणारच. ठाकरे परिवार आणि शिवसेना संपवायला हे निघाले आहेत मात्र तसं कधीच होणार नाही असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातल्या राजकीय भूकंपाला एक महिना पूर्ण

२१ जूनला महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. २० जूनला विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल लागले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल होते. त्यानंतर हे सगळे आमदार आधी सुरतला त्यानंतर गुवाहाटीला गेले. सुरूवातीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत २७ आमदार होते. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांची संख्या ४० झाली तर अपक्ष १२ आमदार त्यांच्यासोबत गेले. त्यानंतर २९ जूनला महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला.

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर ३० जूनला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर एकनाथ शिंदे यांचं बळ वाढतंच आहे असं दिसतं आहे. एवढंच नाही तर आता एकनाथ शिंदे शिवसेनाही काबीज करू शकतात अशीही चिन्हं आहेत. लोकसभेत असलेल्या १२ खासदारांनीही एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे फुटलेला पक्ष पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्राही सुरू केली आहे. अशा सगळ्यात आज आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर आणि भाजपवर टीका केली आहे.

सरकार चालवताना आपण मुंबईला सगळ्यात जास्त लक्ष दिलं. उद्धव ठाकरे चांगला माणूस असं लोकं म्हणतात.” आदित्य ठाकरे म्हणाले, ”असं बरबटलेलं राजकारण पाहून तरुणांना राजकारणात यावंसं वाटेल का? कोणत्याही गटाचा शिक्का मारला तरी गद्दार हे गद्दारच असतात. गद्दार हाच खरा शिक्का आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

    follow whatsapp