भाजपविरुद्ध शिवसेना-AIMIM एकत्र पण ऐनवेळी डाव फसला आणि…

मुंबई तक

• 04:34 PM • 13 Mar 2021

अमरावती महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपला स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाहेर ठेवण्यासाठी शिवसेना, AIMIM, काँग्रेस सह सर्व विरोधीपक्षांनी जय्यत तयारी केली होती. एरवी एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणाऱ्या शिवसेना आणि AIMIM ने एकत्र येऊन भाजपविरोधात आखलेली रणनिती चर्चेचा विषय ठरत होती. परंतू ऐनवेळी झालेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये भाजपचाच उमेदवार स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर निवडून आला आणि विरोधकांचा […]

Mumbai Tak
Google CTA

अमरावती महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपला स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाहेर ठेवण्यासाठी शिवसेना, AIMIM, काँग्रेस सह सर्व विरोधीपक्षांनी जय्यत तयारी केली होती. एरवी एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणाऱ्या शिवसेना आणि AIMIM ने एकत्र येऊन भाजपविरोधात आखलेली रणनिती चर्चेचा विषय ठरत होती. परंतू ऐनवेळी झालेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये भाजपचाच उमेदवार स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर निवडून आला आणि विरोधकांचा डाव फसला. परंतू शिवसेना-AIMIM ची ही युती राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.

हे वाचलं का?

अमरावती महापालिकेत सध्या भाजप सत्तेत आहे. परंतू महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस, शिवसेना, बसप आणि AIMIMया पक्षांनी एकत्र येऊन भाजपला धक्का दिला. ११ मार्चला ही निवडणुक पार पडली. परंतू ऐनवेळी स्थायी समितीच्या निवडणुकीत महापालिकेत चांगलंच नाट्य पहायला मिळालं.

भाजपला स्थायी समितीतून बाहेर ठेवण्यासाठी काँग्रेससह शिवसेना, एमआयएम आणि बसपने एकत्र येण्याचं ठरवलं. परंतू ऐनवेळी बसपचे नगरसेवक चेतन पवार अनुपस्थित राहिले. यावेळी भाजपमधील नाराज नगरसेवक मतदानाला हजर राहणार नाहीत असा सर्वांना अंदाज होता. परंतू विरोधकांचा हा अंदाजही चुकला आणि भाजपचे उमेदवार शिरीष रासने ९ मतांसह स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर निवडून आले. अमरावती महापालिकेत भाजपचे ८ नगरसेवक असून स्थानिक पक्षाच्या एका उमेदवाराचाही भाजपला पाठींबा आहे. त्यामुळे राज्यात सध्या शिवसेना-AIMIM च्या या फसलेल्या प्रयोगाची जोरदार चर्चा सुरु आहे.

या निवडणुकीनंतर भाजपने लगेच शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हेच का शिवसेनेचं हिंदुत्व?? सत्तेत राहण्यासाठी शिवसेना हिंदुत्वाला तिलांजली देण्याचं काम करत असल्याची प्रतिक्रीया भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी दिली. तर अमरावतीच्या महापालिकेत शिवसेनेच्या एकमेव नगरसेविका असलेल्या जयश्री कुरेकर यांनी, ”भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यापूरते आम्ही एकत्र आला होतो. आम्ही हिंदुत्व विसरलो नाही. हिंदुत्व म्हणजे हिंदुस्थानात राहणारे सर्व नागरिक. AIMIM कोणी वेगळे नाहीयेत. आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची भाजपला गरज नाही. शिवसेनेने कधीही हिंदुत्वाशी गद्दारी केली नाही आणि करणारी नाही आणि जे लोक नागरिक जे मतदार ते कोणीही जाती धर्माचे आहेत ते हिंदुस्तानी आहेत तेच हिंदू आहेत असे आम्ही समजतो”, अशी प्रतिक्रीया दिली.