हरयाणा (वृत्तसंस्था) : ईडी, सीबीआय अशा केंद्रीय तपास यंत्रणांपाठोपाठ आता एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेलाही अतिरिक्त ताकद देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज याबाबत माहिती दिली. ते हरयाणामधील सुरजकुंड येथे सर्व राज्यांतील गृहमंत्र्यांच्या दोन दिवसीय चिंतन शिबिरामध्ये बोलत होते. यावेळी महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
ADVERTISEMENT
या चिंतन शिबिराच्या उद्घाटनपर भाषणात बोलताना अमित शाह यांनी शिबिराच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. ते म्हणाले, सायबर गुन्हे, अंमली पदार्थ, सीमापार दहशतवाद, देशद्रोह आणि अशा प्रकारच्या इतर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या गृहमंत्रालयांना संयुक्त आखण्यास हे चिंतन शिबिर मदत करेल. तसंच आपल्याला ‘तीन सी’ ला महत्व द्यायचं आहे. अर्थात सहकार्य (Cooperation), समन्वय (Coordination) आणि सहयोग (Collaboration).
याचवेळी बोलताना अमित शाह म्हणाले, एनआयएला आता कक्षेबाहेरील अधिकार देण्यात येत आहेत. तसंच 2024 पर्यंत प्रत्येक राज्यात एनआयएची शाखा स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. यासोबतच फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय दंड विधान यामध्ये सुधारणा करण्याबाबत अनेक सुचना आल्या आहेत. आम्ही लवकच याबाबत विचार करुन संसदेत नवीन CrPC, IPC चा मसुदा सादर करु.
आपल्या संविधानात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी संबंधित राज्यावर दिली आहे. पण बदलत्या काळानुसार, बदलत्या तंत्रज्ञानानुसार अनेक असे कायदे अस्तित्वात आले आहेत, ज्या कायद्यांना सीमा राहिलेली नाही. या सीमारहित गुन्ह्यांचा सामना करण्यात आपण तेव्हाच यशस्वी होऊ शकतो जेव्हा सगळे राज्य मिळून यावर विचार करतील, आणि रणनीती बनवतील, असेही अमित शाह म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती :
दरम्यान, या मेळाव्याला महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी त्यांचे काही फोटोही समोर आले आहेत. या फोटोंमध्ये ते गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांच्या शेजारी बसलेले दिसून येत आहेत.
ADVERTISEMENT
