Pawar-Modi बैठकीत काय झाली चर्चा? महत्वाचा तपशील आला समोर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज दिल्लीत भेट झाली. सुमारे एक तासभर सुरु असलेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. तब्बल १९ महिन्यांनी पवार-मोदी भेटीमुळे राज्यातली राजकीय समीकरणं बदलतात की काय अशा चर्चा सुरु असताना या भेटीमागचा तपशील समोर आला आहे. या भेटीत कोणत्याही राजकीय विषयावर […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:56 AM • 17 Jul 2021

follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज दिल्लीत भेट झाली. सुमारे एक तासभर सुरु असलेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. तब्बल १९ महिन्यांनी पवार-मोदी भेटीमुळे राज्यातली राजकीय समीकरणं बदलतात की काय अशा चर्चा सुरु असताना या भेटीमागचा तपशील समोर आला आहे. या भेटीत कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झालेली नसल्याचं स्पष्टीकरण पवारांनी दिलं आहे.

हे वाचलं का?

सहकारी बँकांसाठी आरबीआयने नियमांत केलेले बदल आणि केंद्र सरकारच्या नवीन सहकार खात्यासंदर्भात चर्चेसाठी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची वेळ मागितली होती. त्यानुसारच ही भेट झाली आहे. संसदेने सप्टेंबर २०२० मध्ये बँकींग रेग्युलेशन विधेयक पारित केलं होतं. यानुसार आता सहकारी बँकांवरही आरबीआयचं नियंत्रण असणार आहे.

महत्वाची बातमी ! शरद पवारांनी घेतली PM Narendra Modi यांची भेट

परंतू सहकारी बँका या राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे राज्यांच्या अधिकाऱांवर गदा येऊ नये यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाल्याचं कळतंय. सध्याच्या घडीला सहकारी बँकाचं अस्तित्व टिकवणं गरजेचं असून नवीन नियमांमुळे कोणाच्याही अधिकारांवर गदा येणं योग्य ठरणार नाही असंही पवार म्हणाले. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारात सहकार खात्याची नव्याने निर्मिती करण्यात आली. अमित शाहांकडे या खात्याची धुरा देण्यात आल्यामुळे शरद पवारांच्या या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे.

याव्यतिरीक्त दोन्ही नेत्यांमध्ये देशातील कोरोनाच्या स्थितीवरही चर्चा झाली. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होण्याआधी भाजप सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. शरद पवार देखील या बैठकीला हजर राहणार आहेत. पवार आणि मोदी यांच्यातील शेवटची भेट २०१९ साली झाली होती. त्यावेळी राज्यात शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे या भेटीवर राजकीय क्षेत्रातून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.