केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल, शिंदेंच्या 'त्या' खासदाराला लॉटरी लागणार?

Union Cabinet reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलाच्या चर्चांना वेग आला असून गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्याला मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Union Cabinet reshuffle

Union Cabinet reshuffle

मुंबई तक

27 Jun 2026 (अपडेटेड: 27 Jun 2026, 09:10 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल

point

शिंदेंच्या 'त्या' खासदाराला लॉटरी लागणार?

Union Cabinet reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. याआधी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राष्ट्रपतींची भेट घेतली होती. या सलग बैठकींमुळे केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. राष्ट्रपती भवनाने 'एक्स'वरील पोस्टमध्ये अमित शहा यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याचे सांगत त्यांचे फोटोही शेअर केले. या घडामोडी अशा वेळी घडत आहेत, जेव्हा काही केंद्रीय मंत्र्यांना राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही, तर काहींना त्यांच्या राज्यांमध्ये पक्ष संघटनेची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर, म्हणाले, 'एक स्ट्राँग व्यवस्था...'

कोणत्या मंत्र्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला? 

काही आठवड्यांपूर्वी केरळमधील भाजपचे ज्येष्ठ नेते जॉर्ज कुरियन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ते अल्पसंख्याक व्यवहार तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री होते. त्याचप्रमाणे रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री सिंह यांचाही राज्यसभेचा कार्यकाळ 21 जून रोजी संपला असून भाजपने त्यांनाही पुन्हा राज्यसभेची उमेदवारी दिलेली नाही. दुसरीकडे, काही केंद्रीय मंत्र्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्ली भाजप अध्यक्षपदी, तर केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांची उत्तर प्रदेश भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व बदलांमुळे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या शक्यतेबाबतची चर्चा आणखी वाढली आहे.

हेही वाचा : बदलापूर : प्राजक्ता हार्ट अटॅकने गेल्याचा बनाव, 'बाहेरवाली'च्या नादात नवऱ्याचं मोठं कांड

शिंदेंच्या शिवसेनेतील कोणते नावर चर्चेत? 

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल झाल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक अतिरिक्त राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदार सहभागी झाल्यानंतर पक्षाची लोकसभेतील संख्या 13 वर पोहोचली आहे. सध्या प्रतापराव जाधव हे आयुष राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात शिवसेनेचे एकमेव नेते आहेत. पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, बंडखोर खासदारांपैकी परभणीचे तीन वेळा खासदार राहिलेले संजय जाधव यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळू शकते. मात्र, अंतिम निर्णय एकनाथ शिंदे आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतला जाईल. प्रतापराव जाधव यांच्या जागी दुसऱ्या खासदारालाही संधी मिळू शकते, अशीही चर्चा आहे.

शिवसेनेच्या सूत्रांच्या मते, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे किंवा पक्षातील अन्य वरिष्ठ खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळू शकते. 'ऑपरेशन टायगर'मध्ये श्रीकांत शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी बंडखोर खासदारांशी अनेक बैठका घेतल्याचेही सांगितले जात आहे. सहा खासदार पक्षात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेची लोकसभेतील ताकद 13 खासदारांपर्यंत पोहोचली असून काँग्रेसच्या 14 खासदारांनंतर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. मुंबईतही पक्षाचे दोन खासदार असून भाजपकडे एकच खासदार आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्त्व वाढल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. मात्र, या घडामोडींमुळे ज्या मतदारसंघांत भाजपविरोधात निवडणूक लढवलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या खासदारांनी पक्षांतर केले आहे, त्या मतदारसंघांमध्ये भाजपला राजकीय समन्वय साधावा लागणार असल्याची चर्चा आहे.