आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने तयारीला सुरुवात केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भरुचमध्ये सभेत बोलत असताना गुजरात भाजपच्या वर्मावर घाव घालत भूमिपुत्राचा मुद्दा चर्चेत आणला आहे.
ADVERTISEMENT
गुजरात भाजपचं नेतृत्व महाराष्ट्रातला माणूस का करतो, गुजराती का नाही? असा प्रश्न विचारत केजरीवालांनी भाजपला कोंडीत पकडलं आहे. माजी खासदार सी.आर.पाटील हे गुजरात भाजपचे प्रमुख आहेत.
भरुच येथील आदिवासी विकास महासंमेलनात बोलत असताना केजरीवालांनी सी.आर.पाटील यांच्यावर टीका करत भाजपला थेट आव्हान दिलं आहे. “गुजरात भाजपचं नेतृत्व हा महाराष्ट्रातील व्यक्ती कसं करु शकतो, इथे गुजराती व्यक्ती का नाही?” असा प्रश्न केजरीवालांनी विचारला आहे.
अरविंद केजरीवाल आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले?
मला एक गोष्ट समजत नाही की गुजरात भाजपचं अध्यक्ष कोण आहे? कोण आहेत सी.आर.पाटील? मला ही गोष्ट समजली नाही की भाजपला राज्याचं नेतृत्व करण्यासाठी कोट्यवधींच्या गुजरातमध्ये एकही गुजराती सापडला नाही? हा गुजरातच्या जनतेचा अपमान आहे. आता गुजरातचा कारभार महाराष्ट्रातून चालवला जाणार आहे का? हा गुजरातचा मोठा अपमान आहे. लोकं म्हणतात की सी.आर.पाटील हे फक्त गुजरात भाजपचे अध्यक्ष नसून ते सरकार चालवतात. गुजरातचे खरे मुख्यमंत्री हे सी.आर.पाटीलच आहेत. गुजरातच्या जनतेचा हा मोठा अपमान आहे.
सी.आर.पाटील यांनीही केजरीवालांच्या या टीकेला उत्तर देत खलिस्तानचा मुद्दा पुढे आणत, अरविंद केजरीवाल हे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. “खलिस्तान समर्थकांना पक्षात महत्वाची जबाबदारी देणं आणि खलिस्तान हा संविधानीक हक्क असल्याचं वक्तव्य करणारे अरविंद केजरीवाल हे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत.”
सी.आर.पाटील हे गुजरात भाजपचे महत्वाचे नेते मानले जात असून गुजरात सरकारच्या निर्णयांमध्ये त्यांच्या शब्दाला मोठा मान असतो.
दरम्यान सी.आर.पाटलांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना गुजरात आप चे नेते इसुधन गढवी यांनी, केजरीवाल हे सच्चे देशभक्त आहेत, लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे. केजरीवाल तुम्हाला चांगलं शिक्षण, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा देतात. त्यामुळे आम्हाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशा शब्दांत उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
