भाजपने इक्बाल मिर्चीच्या कंपनीकडून देणगी का घेतली? अनिल गोटेंचा सवाल, ईडीकडे करणार तक्रार

मुंबई तक

• 03:30 AM • 03 Mar 2022

2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं. त्यानंतर 2014-15 मध्ये कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा आणि देशद्रोही इक्बाल मिर्ची याच्या कंपनीकडून भाजपने देणगी का स्वीकारली? असा प्रश्न आता माजी आमदार अनिल गोटे यांनी विचारला आहे. एवढंच नाही तर यासंदर्भात आपण ईडीकडे तक्रार देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. राज्याचे […]

Mumbaitak
follow google news

2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं. त्यानंतर 2014-15 मध्ये कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा आणि देशद्रोही इक्बाल मिर्ची याच्या कंपनीकडून भाजपने देणगी का स्वीकारली? असा प्रश्न आता माजी आमदार अनिल गोटे यांनी विचारला आहे. एवढंच नाही तर यासंदर्भात आपण ईडीकडे तक्रार देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीसोबत मालमत्तेचा व्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना ईडीने अटकही केली आहे. या प्रकरणात मनी लाँड्रींग झाल्याचा संशयही ईडीला आहे. हे सगळं प्रकरण ताजं असतानाच आता अनिल गोटे यांनी हा प्रश्न भाजपला विचारला आहे.

हे वाचलं का?

आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आहे. या अधिवेशनात नवाब मलिक यांच्या अटकेनंतरही त्यांचा न घेतलेला राजीनामा तसंच दाऊदच्या संबंधितांशी त्यांनी केलेला व्यवहार हे सगळे प्रश्न विरोधक उपस्थित करू शकतात. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.

भाजपकडून नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी सातत्याने मागणी केली जाते आहे. तुरुंगात असताना एखादी व्यक्ती मंत्रिपदावर कशी काय राहू शकते? असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यानंतर आता अनिल गोटे यांनी भाजपला प्रश्न विचारला आहे. 2015 मध्ये इक्बाल मिर्चीशी संबंधित कंपनीकडून भाजपने 10 कोटींची देणगी कशी काय घेतली? असा प्रश्न आता त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपला 2015 मध्ये आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स कंपनीकडून 10 कोटी रूपये देणगी दिली गेली असा उल्लेख आहे.

भाजपकडून नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्याची आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असेल तर मग भाजपला आलेल्या या देणगी प्रकरणात ईडी देणगीसंबंधीचा तपास करणार का? तसंच याबाबत आता केंद्रीय तपास यंत्रणा देशद्रोहाचा खटला कुणाच्या विरोधात दाखल करणार असाही प्रश्न अनिल गोटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे विचारला आहे.

कोण होता इक्बाल मिर्ची?

इकबाल मिर्ची हा मिरची व्यवसायातून अंडरवर्ल्ड मध्ये आला होता. इक्बाल मेमनला इक्बाल मिर्ची या नावाने ओळखलं जात होतं. तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक होता. 2013 ला हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाला. मनी लाँड्रींग प्रकरणात इक्बाल मिर्चीविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केलं होतं. तो अंमली पदार्थांची तस्करी करत होता आणि त्यानंतर त्याने दाऊदसाठी काम सुरू केलं. 1987 च्या दरम्यान तो दुबईला पळाला होता.

    follow whatsapp