नितीन राऊतांचं कौतुक करणारे मुख्यमंत्री, राठोडांवर कारवाई करतील?

मुंबई तक

• 11:25 AM • 23 Feb 2021

महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोना रूग्ण वाढत असल्याने त्यांच्या मुलाचा विवाह सोहळा रद्द केला. या सोहळ्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं होतं. मात्र कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी हा सोहळा रद्द केला. या गोष्टीचा विशेष उल्लेख करत नितीन राऊत यांनी जी सामाजिक जाणीव दाखवली तशीच सामाजिक जाणीव सगळ्या मंत्र्यांनी, जनतेने […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोना रूग्ण वाढत असल्याने त्यांच्या मुलाचा विवाह सोहळा रद्द केला. या सोहळ्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं होतं. मात्र कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी हा सोहळा रद्द केला. या गोष्टीचा विशेष उल्लेख करत नितीन राऊत यांनी जी सामाजिक जाणीव दाखवली तशीच सामाजिक जाणीव सगळ्या मंत्र्यांनी, जनतेने दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी महाराष्ट्राशी जो संवाद साधला त्यामध्ये केलं. अशात आज वनमंत्री आणि शिवसेनेचे नेत संजय राठोड हे पोहरादेवी या ठिकाणी गेले असताना कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडाला. आता प्रश्न हा निर्माण होतो आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करतील का?

हे वाचलं का?

ही बातमी वाचलीत का? मुलाचा लग्न सोहळा रद्द करणाऱ्या मंत्र्याचं CM ठाकरेंकडून कौतुक

नेमकं काय घडलं आज?

पूजा चव्हाण या टिकटॉक स्टारने ७ फेब्रुवारीला आत्महत्या केली. त्यानंतर उलटसुलट चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या. त्यानंतर दोन दिवसांनी १२ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. यातला एक आवाज हा संजय राठोड यांचा आहे असा आरोप भाजपने केला आणि संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली. तसंच संजय राठोड नॉट रिचेबल का आहेत असाही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर आज संजय राठोड हे माध्यमांसमोर आले. त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणात आपल्याला नाहक बदनाम केलं जातं आहे असं सांगितलं तसंच या प्रकरणावरून माझी आणि माझ्या समाजाची बदनामी थांबवा असंही आवाहन केलं. संजय राठोड हे पोहरादेवी या ठिकाणी आले तेव्हा त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते तिथे हजर होते. कोरोनाच्या नियमांचं पूर्णपणे उल्लंघन करण्यात आलं.

विदर्भातल्या यवतमाळ, अमरावती, नागपूर, अकोला या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. यवतमाळमध्ये तर लॉकडाऊनही सुरू करण्यात आला आहे. तर इतर शहरांमध्येही निर्बंध लादण्यात आले आहेत. अशी सगळी परिस्थिती असताना संजय राठोड यांच्या समर्थनाला वाशिममधल्या पोहरादेवी या ठिकाणी हजारो समर्थक आले होते. हे समर्थक इतक्या मोठ्या प्रमाणावर आले होते की त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करून त्यांना पांगवावं लागलं. अशात आता हा प्रश्न उपस्थित होतो आहे की या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर मुख्यमंत्री कारवाई करणार का?

काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असं आवाहन केलं होतं की कोणत्याही प्रकारच्या सभा, धार्मिक उत्सव, या सगळ्यांमध्ये गर्दी होणार नाही यावर लक्ष द्या. विरोधकांना टोला लगावत ते असंही म्हणाले होते की पक्ष जरूर वाढवा पण कोरोना नको. सामाजिक जाणीव जपा असंही आवाहन त्यांनी केलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला हरताळ फासण्याचं काम शिवसेनेच्याच मंत्र्याने केलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे त्यांच्याविरोधात कारवाई करणार का असा प्रश्न निश्चितच उपस्थित होतो आहे.

    follow whatsapp