आपल्या अल्पवयीन प्रेयसीसोबत उत्तर प्रदेशातून पळून येणं एका युवकाला चांगलंच महागात पडलं आहे. मुलीच्या घरच्यांनी युवकाला ट्रेनमधून धक्का दिल्याने, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. साहिल हाशमी असं या मृत तरुणाचं नाव आहे.
ADVERTISEMENT
साहिल आपल्या प्रेयसीला सोबत घेऊन उत्तर प्रदेशातून ट्रेनने मुंबईला यायला निघाला. या गोष्टीची माहिती मुलीच्या घरच्यांना समजली आणि त्यांनी कल्याणला याच ट्रेनमध्ये चढून साहिलला धडा शिकवायचं ठरवलं. कल्याण स्टेशनमध्ये गाडी पोहचताच साहिलला आपल्या अल्पवयीन बहिणीसोबत पाहून तिच्या भावाने साहिलला मारहाण करायला सुरुवात केली.
दोघांमध्ये यावेळी चांगलीच जुंपली. यावेळी मुलीकडच्या लोकांनी साहिलला धक्का दिला. ज्यामुळे तो कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकाच्या मध्ये पडला. या घटनेची माहितची मिळताच स्थानिक रेल्वे पोलिसांनी साहिलला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. परंतू ४ दिवसांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
१८ जून रोजी साहिल उत्तर प्रदेशातील भदोई येथून आपल्या प्रेयसीसोबत मुंबईला जाण्यासाठी निघाला. या मुलीचे काही नातेवाई अंबरनाथ आणि मुंबईत राहतात. १९ जूनला साहिलची गाडी कल्याण स्टेशनमध्ये येताच मुलीच्या भावांनी गाडीतच त्याला मारहाण करायला सुरुवात केली. डोंबिवली रेल्वे पोलीस या घटनेचा तपास करत होते. तब्बल एका महिन्याच्या कालावधीनंतर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणात १० जणांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
