“ठाण्यातून लढणार अन् जिंकूनही येणार!” शिंदेंच्या बालेकिल्ल्यातूनच ठाकरेंनी दिलं आव्हान

मुंबई तक

05 Apr 2023 (अपडेटेड: 05 Apr 2023, 04:22 PM)

ठाण्यात रोशनी शिंदे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्ह काढण्यात आलेल्या जनप्रक्षोप मोर्चात आदित्य ठाकरेंचे भाषण, काय म्हणाले?

Shivsena (UBT) Leader Aditya Thackeray in Thane protesting the attack on Roshni Shinde

Shivsena (UBT) Leader Aditya Thackeray in Thane protesting the attack on Roshni Shinde

follow google news

Aditya Thackeray News :

हे वाचलं का?

ठाणे : स्वतःच्या शहरामध्ये, जो स्वतःचा बालेकिल्ला मानायचे, ते आता मानत नाहीत. कारण मी त्यांना सांगितलं, चॅलेंज द्या, मी ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकून दाखवणार, असं जाहीर आव्हान शिवसेना (UBT) चे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. ते आज आज ठाण्यात रोशनी शिंदे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्ह काढण्यात आलेल्या जनप्रक्षोप मोर्चात बोलत होते. (A march led by Shivsena (UBT) Leader Aditya Thackeray in Thane protesting the attack on Roshni Shinde)

पोलीस आयुक्त कार्यालयाला टाळे लावून पळाले :

ठाकरे म्हणाले, आमच्या मोर्चासाठी राज्य सरकारकडून 17 अटी घालण्यात आलेल्या आहेत. आता महाराष्ट्रात मोर्चा काढायचा नाही, भाषण करायचे नाही? लोकशाही आहे की संपली? ज्यासाठी मोर्चा घेतला तर त्यांच्याविरोधात बोलायचं नाही का? त्यांचं कौतुक करायचं का? गद्दार लोकांच्या टोळीने रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्याविरोधात तक्रार करण्यासाठी आधी आमचे नेते पोलीस आयुक्तांकडे गेले, तरीही तक्रार घेतली नाही, चिडून उद्धव ठाकरे गेले. पण पोलीस आयुक्त कार्यालयाला टाळे लावून पळाले. मी आता मोठं टाळं घेऊन आलो आहे, पोलीस आयुक्तालयाला घालणार आहोत.

हेही वाचा : विरोधी पक्षांना ‘सर्वोच्च’ दणका; ED-CBI ची ताकद आणखी वाढणार?

सरकारला मदत करणाऱ्या IAS, IPS अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकणार :

तुम्हाला आज सांगतो मी, हे गद्दारांचे सरकार काही वर्षांचे, काही महिन्यांचे नाही तर काही तासांचे आहे. हे सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. कधी आम्ही बदल्याच्या भूमिकेत काम करत नाही, पण या सरकारला जे कोणी आयएएस, आयपीएस अधिकारी मदत करत असतील, सरकारचे चिलटे म्हणून काम करत असतील त्यांची चौकशी करणार आणि त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. हाच निश्चय करण्यासाठी आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर आलो आहे, असा निर्धार ठाकरेंनी बोलून दाखविला.

एकनाथ शिंदे यांची मिमिक्री :

यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री केली. ते म्हणाले, “शर्ट खालती-वरती करीत, वर-खाली बघून दाढी खाजवत ते महिलांबद्दल अभद्र भाषा बोलतात. आदित्य ठाकरे यांच्या या मिमिक्रीवर आणि हावभावामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. उपस्थितांनी वन्स मोअरचे नारे दिले. त्यावर ठाकरे यांनी वन्स मोअर नाही, असे लोक ‘ओनली वन्स’ होतात, त्यांना परत येऊ द्यायचे नाही, असा टोला हाणला.

हेही वाचा : ‘…मग काडतूस कुठे घुसतं ते दाखवतो’, संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज

माफ करायच्या लायकीचेही नाही :

फेसबुकवर फक्त एक पोस्ट टाकली म्हणून तुम्ही महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्यावर उपचार चालू होते, त्या हात जोडून म्हणतं होत्या मारु नका, तरी ऐकायला तयार नव्हते. त्यांच्याकडून माफीचा व्हिडीओ बनवून घेतला. खरंतरं तुम्ही माफी मागण्याच्या लायकीचे पण नाही आणि माफ करायच्या लायकीचेही नाही. तसंच इथून पुढेही माफ करणार नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितलं.

आज रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली, पण पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी रोशनी शिंदे यांच्याविरोधातच गुन्हा दाखल केला. आज त्या रुग्णालयात आहेत, पण त्यांच्या रुमच्या बाहेर पोलिस बसवण्यात आले आहेत. त्या बऱ्या झाल्या, त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेच त्यांना अटक करण्यात येईल, अशी शक्यताही यावेळी ठाकरेंनी बोलून दाखविली.

हेही वाचा : ‘Devendra Fadnavis फडतूस गृहमंत्री’ : उद्धव ठाकरेंचा चढला पारा; थेट राजीनाम्याची मागणी

मुख्यमंत्री महिलांवरील अत्याचाराबाबत गप्प :

एक गद्दार सुप्रिया सुळे यांना जाहीर शिव्या देतो, माफी मागितलेलं ऐकलं? कुठे समज दिलेली ऐकलं? उलट त्याला मंत्रिमंडळात कायम ठेवलं. दुसरा एक गद्दार सुषमा अंधारे यांना शिव्या दिल्या, त्याला मांडीला मांडी लावून बसवलं जातं. आज कुठेही असं सरकार नसेल की मुख्यमंत्री महिलांवर अत्याचार होतात त्यावर काहीच बोलत नाहीत, जे अत्याचार करतात त्यांना मात्र कौतुकाची थाप देतात.

    follow whatsapp