Ahilyanagar Crime : आहिल्यानगर परिसरात सोमवारी (1 डिसेंबर) उघडकीस आलेलं एक प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय ठरलंय. नोटरीद्वारे विवाह करून सासरी निघालेल्या नवरीने अर्ध्या रस्त्यातून अचानक कार बदलून पलायन केल्याची घटना समोर आली आहे. या संपूर्ण प्रकारात 29 वर्षीय शेतकरी अशोक बांदल यांची तब्बल 3 लाखांची फसवणूक झाली आहे.
ADVERTISEMENT
लग्नासाठी ‘स्थळ’ दाखवण्याचा सौदा
अशोक बांदल हे योग्य वधूच्या शोधात होते. दरम्यान त्यांची ओळख दोन महिन्यांपूर्वी अरविंद राठोड नावाच्या व्यक्तीशी झाली. गावाकडील मुलींची चांगली स्थळे असल्याचे सांगून अरविंदने अशोकचा विश्वास जिंकला. त्याने काही मुलींचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले. त्यापैकी ‘माया शिंदे’ नावाच्या मुलीला अशोकने पसंत केले. मुलीचे वडील निधन झाले असून ती आई आणि भावासोबत राहत असल्याचे तसेच कंपनीत काम करत असल्याची माहिती अरविंदकडून देण्यात आली. लग्नासाठी 3 लाख रुपये ‘स्त्रीधन’ म्हणून द्यावे लागतील, अशी अटही त्याने घातली.
नोटरीवरच विवाह उरकला
30 नोव्हेंबर रोजी ठरल्याप्रमाणे अशोक, त्यांचा चुलतभाऊ आणि नातेवाईक बजाजनगरातील अयोध्यानगरात सविता शिंदे यांच्या घरी मुलगी पाहण्यासाठी गेले. दोघांची पसंती झाल्यानंतर सर्वजण छत्रपती संभाजीनगरातील कोर्टात गेले. वकीलांच्या उपस्थितीत 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर नवरा–नवरी स्वखुषीने विवाह करत असल्याची नोटरी करण्यात आली. कोर्टातून परतल्यावर अशोकने ठरल्याप्रमाणे 1 लाख 45 हजार रुपये फोन पेवर आणि 1 लाख 55 हजार रुपये रोख अशी एकूण 3 लाखांची रक्कम दिली.
हेही वाचा : Mumbai Crime : 14 वर्षीय लेक झोपेत असताना बापानेच ब्लेडने गळा चिरला; पत्नीच्या पोटावरही केले वार
सासरी निघतानाच नवरीचा पलायन
रक्कम मिळाल्यानंतर मुलीची आई सविता शिंदे यांनी “मायाला आजच सोबत घ्या, उद्या गावाकडे लग्न समारंभ करू” असे सांगितले. त्यानुसार मायाला कारमध्ये बसवून सर्वजण निघाले. मात्र काही अंतरावर गेल्यावर अचानक एक पांढरी, विना क्रमांकाची कार त्यांच्या वाहनासमोर येऊन थांबली. त्या कारमधून चार जण उतरले. क्षणात मायाने बांदल यांच्या कारमधून उतरून दुसऱ्या कारमध्ये बसून घेतले. ती कार काही सेकंदात गायब झाली आणि अशोक व नातेवाईक अवाक् झाले.
फोन बंद, घराला कुलूप – फसवणूक उघड
धक्क्यातून सावरताच अशोकने मायाला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन बंद होता. ते तिच्या घरी गेल्यावर घराला कुलूप असल्याचे दिसले. आई सविताचा फोनही बंद असल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर अशोक बांदल यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अरविंद राठोड, गुड्डा राठोड, सविता शिंदे आणि माया शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करत आहेत. या घटनेमुळे लग्नाच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणूक रॅकेट्सबद्दल पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











