Bhaskar Jadhav vs Milind Narvekar : पक्ष फुटून काही तास उलटत नाही तोच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. शिवसेनेच्या वर्धापण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात आमदार मिलिंद नार्वेकरांच्या गाडी आल्याने आमदार भास्कर जाधव यांना बाजूला सरकावे लागले. नार्वेकरांचे ड्रायव्हर सतत हॉर्न वाजवत असल्याने भास्कर जाधवांचा चांगलाच पारा चढला. त्यानंतर भास्कर जाधवांनी 'नार्वेकर कोण लागून गेला' अशा शब्दात राग व्यक्त केला होता. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT
नार्वेकर अन् जाधवांच्या वादावर मुख्यमंत्र्यांची टिप्पणी
सतत जोरात हॉर्न वाजत असल्याने चिडलेल्या भास्कर जाधवांनी 'नार्वेकर कोण लागून गेला ' अशा शब्दांत राग व्यक्त केला. रविवारी (दि.21) संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणावरून 'ठाकरे गटातच ऑपरेशन तुडवा' सुरू असल्याची टीका केली. या सगळ्या प्रकरणानंतर आता मिलिंद नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करून भास्कर जाधवांवर जोरदार टीका केलीय.
नेमकं काय घडलं?
तर घडलं असं की मुंबईतकच्या प्रतिनिधी अनुजा धाक्रस यांनी घेतलेल्या मुलाखतीत भास्कर जाधव पुढे चालत संवाद साधत होते. तेव्हा मिलिंद नार्वेकरांची गाडी मागून आली, गर्दी खूप असल्याने नार्वेकरांच्या ड्रायव्हरने जोरात हॉर्न वाजवला. परिणामी भास्कर जाधव प्रचंड चिडले आणि तिथेच त्यांनी 'कोण लागून गेला हा नार्वेकर' असं म्हणत संताप व्यक्त केला.
मिलिंद नार्वेकरांचं भास्कर जाधवांना प्रत्युत्तर
आता मिलिंद नार्वेकरांनी एक्सवर एक पोस्ट केलीय, ज्यात त्यांनी भास्कर जाधव हे फस्ट्रेट झाल्याचं म्हटलंय. पुढे ते म्हणतात, माननीय मुख्यमंत्री महोदय जी, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे, असं म्हणत नार्वेकरांनी भास्कररावांच्या टीकेचा वचपा काढला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता नेमण्यात यावा, यासाठी यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्रं लिहिलेलं आहे. ठाकरे गटाकडून भास्कर जाधवांचंच नाव कन्फर्म करण्यात आलं होतं. त्याचाच उल्लेख करत मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या टीकेमुळे आता ठाकरे गटात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होतो आहे.
ADVERTISEMENT











