'बडोद्यात सगळे महापौर हे गुजराती का होतात? मुंबईत मराठीच महापौर', राज ठाकरेंचा भाजपला करडा सवाल अन्...

मुंबई तक

• 03:03 PM • 04 Jan 2026

मुंबईतील मराठी महापौर या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. यासोबत त्यांना एक सवालही विचारला आहे.

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election)पार्श्वभूमीवर शिवसेना UBT आणि मनसे यांनी आज (4 डिसेंबर) संयुक्त वचननामा प्रसिद्ध केला. ज्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या हिंदू-मराठी महापौर यावर टीका करत त्यांना करडा सवालही विचारला.

हे वाचलं का?

'बडोद्यामध्ये सगळे महापौर हे गुजराती का होतात? हा महाराष्ट्र आहे आणि येथील प्रत्येक शहरातील महापौर हा मराठीच होणार. इथे कसलं हिंदू-मराठी करतायेत तुम्ही.. मी त्यादिवशी म्हटलं ना.. आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही.' असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा या मुद्द्यावरून भाजपला ठणकावलं आहे.

हे ही वाचा>> मुंबईत मराठी माणूस ठाकरे बंधूंना साथ देणार की महायुतीला? असेंडिया कंपनीचा सर्वात मोठा सर्व्हे समोर

पाहा मुंबईच्या महापौर पदाबाबत नेमकं काय म्हणाले राज ठाकरे

'थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो. पेशव्यांच्या काळामध्ये तीन संस्थानं उभी राहिली. त्यामध्ये गुजरातमध्ये गायकवाडांचं, शिंदेंचं.. सिंधिया म्हणतो ते आणि तिसरं होळकरांचं.. जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं. ते मराठेशाहीचं साम्राज्य आहे. बरोबर?'

 

'अशावेळी त्या बडोद्यामध्ये सगळे महापौर हे गुजराती का होतात? हा महाराष्ट्र आहे आणि येथील प्रत्येक शहरातील महापौर हा मराठीच होणार. इथे कसलं हिंदू-मराठी करतायेत तुम्ही.. मी त्यादिवशी म्हटलं ना.. आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही.'

 

'तुम्हाला महाराष्ट्रात मराठीचा मान हा राखलाच पाहिजे. त्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार.' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

'भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत?', उद्धव ठाकरेंचा सवाल

दरम्यान, याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, 'याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? जसं राज म्हणाला... आम्ही मराठी आहोत अस्सल.. हिंदूच आहोत.. अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो लढा दिला गेला त्यामध्ये आताचं भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता? हा कधी मराठी माणसं आणि हिंदूच्या बाजूने उभा राहिलाय?' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.