मुंबई: शिवसेना UBT पक्षाने काल (29 एप्रिल) विधान परिषद निवडणुकीसाठी अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीत मात्र चलबिचल पाहायला मिळाली होती. शिवसेना UBT ने कोणतीही चर्चा न करता उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नव्हे तर या निवडणुकीत काँग्रेस आपला उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहे असंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसने एक मोठा निर्णय घेतला.
ADVERTISEMENT
विधान परिषद निवडणुकीत जर काँग्रेसने उमेदवार दिला तर महाविकास आघाडीत निवडणुकीदरम्यान, फूट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशावेळी शिवसेना UBT पक्षाचे नेते आणि NCP शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी आज (30 एप्रिल) चर्चा केली.
आज सकाळपासूनच या तीनही पक्षाच्या नेत्यांची चर्चा सुरू होती. अखेर काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेत हर्षवर्धन सकपाळ यांनी काँग्रेस उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केलं. ज्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पाहा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले?
'नुकतंच राज्यसभेवर महाराष्ट्राचे अनुभवी नेतृत्व पवार साहेब गेले.. त्यांना सर्वांनी पाठवलं. आताच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची जी भूमिका होती आणि इतर मित्र पक्षाची जी भूमिका होती.. किंबहुना.. शिवसेना UBT पक्षाची जी भूमिका होती की, उद्धवजींनी महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून विधान परिषदेत जावं. जवळपास आमची सर्वांची तीच धारणा असताना काल त्यांनी त्यांचा अंतरात्माचा जो आवाज आहे. त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की, मी जाणार नाही.'
हे ही वाचा>> शिवसेनेचं ठरलं! विधान परिषदेसाठी दिले 'हे' दोन उमेदवार, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
'ज्या पद्धतीने सोनियाजींनी पंतप्रधान न होण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस त्यांनी स्वत:चं जे मत आहे त्या मतावर ते ठाम राहिले होते.. अगदी तशाच स्वरूपामध्ये कुठे तरी उद्धवजींनी त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे, त्यांच्या आणि सर्वच मित्र पक्ष त्यांना उमेदवारीबाबत म्हणत असताना देखील कुठे तरी थांबणं ही मोठी गोष्ट आहे. त्यातून त्यांनी स्वत: मागे राहत.. त्यांच्या पक्षातील दानवेंजींना उमेदवारी दिली.'
हे ही वाचा>> विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरला, 'या' माजी मंत्र्याच्या मुलाला संधी
'हे होत असताना कुठेतरी एक प्रक्रिया व्हायला हवी होती असं आमचं मत आहे. अर्थात हे काही भांडण किंवा वाद नव्हता.. महाविकास आघाडीमधील सक्षम स्वरूपाची चर्चा या अनुषंगाने जे आज आम्ही बोललो ते आधीही बोललो असतो.. मात्र हरकत नाही.. यामध्ये कोणत्याही प्रकारे कोणाचाही अनादर नाही.'
'तेव्हा शिवसेना UBT पक्षाने आणि उद्धवजींनी घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही समर्थन करतो. हे समर्थन करत असतानाच आगामी काळात महाविकास आघाडी म्हणून भाजपविरोधात उभे ठाकणार आहोत.'
'आमच्या तीनही पक्षांमधील संवाद अधिक वृद्धिंगत केला पाहिजे याबाबत आम्ही ठाम आहोत. त्यामुळे येणाऱ्या सर्व ज्या निवडणुका आहेत त्यासाठी तीनही पक्ष एकत्रितरित्या रणनीती ठरवतील.'
'पुढे येणाऱ्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या ज्या निवडणुका असतील त्यासाठी देखील आमची आघाडी राहील. आज दीर्घ स्वरूपाची चर्चा आमची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभेची एक जागा गेली, विधान परिषेदत एक जागेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जात आहेत. पुढच्या ज्या 2028 आणि 2029 जे काही निर्णय आहेत त्या निर्णयात काँग्रेस पक्ष प्राधान्याने प्रतिनिधित्व करेल. अशीही आमची चर्चा झाली.'
'येणाऱ्या काळात आम्ही सोबत राहू.. आणि या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पाठिंबा हा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उमेदवार म्हणून राहील.'
असं म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं की, विधान परिषद निवडणुकीत ते उमेदवार देणार नाहीत. दरम्यान, यामुळेच ही निवडणूक जवळजवळ बिनविरोध होणार असल्याचं चित्र दिसत आहे.
ADVERTISEMENT











