'मनसे वारंवार भूमिका बदलतं..', पाहा निवडणुकीआधी 'या' प्रश्नावर काय म्हणालेले राज ठाकरे

KDMC MNS: मनसे वारंवार भूमिका का बदलतं? पाहा या प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी नेमकं काय उत्तर दिलं होतं.

mns repeatedly changes its stance see what raj thackeray had said on this issue before kdmc elections

राज ठाकरे

मुंबई तक

• 10:07 PM • 21 Jan 2026

follow google news

मुंबई: कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) निवडणूक निकालानंतर अवघ्या पाचच दिवसात मनसेने ज्या शिवसेनेविरुद्ध (शिंदे गट) प्रचार करत कल्याण-डोंबिवलीकरांकडे मतं मागितली होती त्यांनाच आता पाठिंबा दिला आहे. मनसेने अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका होत आहे. 

हे वाचलं का?

दरम्यान, मनसे वारंवार भूमिका का बदलतं? हाच सवाल मुंबई Tak च्या महाचावडीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विचारण्यात आला होता. पाहा तेव्हा राज ठाकरेंनी नेमकं काय उत्तर दिलं होतं.

पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणालेले

मनसे वारंवार भूमिका बदलतं.. याचबाबतचा प्रश्न मुंबई Tak च्या महाचावडीवर राज ठाकरेंना विचारण्यात आला होता. पाहा तेव्हा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते.

प्रश्न: तुमच्याबाबत असा प्रचार होतो की, मनसे कायम राजकीय भूमिका बदलत जातं, प्रत्येक निवडणुकांमध्ये.. याचा तुम्हाला सर्वाधिक फटका बसतो का मतदानाच्या राजकारणात?

राज ठाकरे: मला साधी गोष्ट सांगा.. पहाटेचा शपधविधी कोणी केला? फडणवीस आणि अजित पवारांनी.. ही भूमिका तीच होती त्यांची आधी? नाही.. ना.. अजित पवारांवर आरोप करणारे.. बैलगाडीभर पुरावे घेऊन जाणारे हे कोण होते? आता फडणवीसांच्या बाजूला उपमुख्यमंत्री म्हणून कोण बसले आहेत? या भूमिकेचं काय करायचं? मी तुम्हाला अशा 500 भूमिका सांगेन भाजपच्या माणसांबद्दलच्या ज्या त्यांनी बदलल्या.. नितीश कुमारबद्दल बदलल्या.. 

शरद पवारांनी तर पायंडाच पाडला भूमिका बदलण्याचा. मी माझ्या कुठच्या तत्त्वापासून आजपासून दूर झालो? हे सांगा मला.. माझी गोष्ट तू करणारएस,हा करतो बोललाय.. हा चांगलाय.. याने नाही करत.. तू करणारए.. माझ्या त्या तत्त्वांमध्ये काही फरक पडला का?

हे ही वाचा>> KDMC: राज ठाकरेंच्या मनसेने पुन्हा बदलली भूमिका?, ज्यांच्या विरुद्ध लढले त्यांच्यासोबतच गेले सत्तेत...

मैत्री, पक्ष या सगळ्या गोष्टी बाजूला सोडा.. मी मराठीसाठी म्हणून आणि हिंदी सक्तीची यासाठी मी उभा राहिलो ना? तिथे मी वैयक्तिक संबंध जपले का? कोणती भूमिका बदलली. यांनी आतापर्यंत कपडे बदलाव्या तशा भूमिका बदलल्या आहेत त्याचं काय करायचं? 

काही लोकं आज इथून.. काँग्रेस.. तिथून भाजप.. त्यांचं काय करायचं? त्यांना तुम्ही कधी प्रश्न विचारत नाही. हे प्रश्न तुम्ही मला का विचारतात? 

अजित पवारांची 70 हजार कोटीची भूमिका समजवून घेतो, तुम्ही सावरकर समजून घ्या.. असं सगळं सुरूय. यांना कोणाला सावरकर समजले आहेत का? यांनी किती सावरकर वाचले आहेत याबाबत शंकाच आहे मला. म्हणजे सर्वात मोठं भांडण किंवा वाद.. हा मला असं वाटतं की, आरएसएस किंवा सावरकरांबद्दलच होता ना.. हे आता कधीपासून सावरकरांबद्दल बोलू लागले?

हे ही वाचा>> राज ठाकरेंनी मुभा दिली म्हणूनच KDMC मध्ये महायुतीला पाठिंबा, मनसेच्या माजी आमदाराने सगळं सांगितलं

सरसंघचालक गोळवलकर यांना जेलमध्ये टाकण्याचं काम कोणी केलं.. वल्लभभाई पटेल, आरएसएसवर बंदी आणण्याचं काम कोणी केलं होतं.. वल्लभभाई पटेल.. त्यांचा पुतळा बांधलाय गुजरातमध्ये. 

प्रश्न असा आहे की, प्रत्येक वेळेस राजकीय सोयीने या सगळ्या गोष्टी, भूमिका बदलत हे आजपर्यंत ही सगळी लोकं एकत्र आली आणि प्रश्न मला तुम्ही विचारताय? असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं होतं. 

दरम्यान, आता कल्याण-डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने आता शिवसेना UBT कडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

    follow whatsapp