KDMC: राज ठाकरेंच्या मनसेने पुन्हा बदलली भूमिका?, ज्यांच्या विरुद्ध लढले त्यांच्यासोबतच गेले सत्तेत...
कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत थेट सत्तेत जाणं पसंत केलं आहे. त्यामुळे मनसेने पुन्हा एकदा त्यांची भूमिका बदली असल्याची टीका त्यांच्यावर आता केली जात आहेत.
ADVERTISEMENT

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आज (21 जानेवारी) सर्वात मोठी आणि अत्यंत बुचकळ्यात टाकणारी घडामोड घडली आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट यांचे सर्वाधिक 53 नगरसेवक निवडून आले. तर त्या पाठोपाठ भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले. खरं तर दोन्ही पक्षांनी युतीत ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे दोघांचे संख्याबळ लक्षात घेता येथे अगदी सहज सत्ता स्थापन होऊ शकत होती. मात्र, महापौर आपलाच असला पाहिजे यावर घोडं अडलं आणि सत्तेसाठीचा सगळा घोडेबाजार सुरू झाला. मागील 5 दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत विचित्र राजकीय घडामोडी सुरू असताना आज अचानक मनसेने सगळा डावच पलटून टाकला. ज्या मनसेने कल्याण-डोंबिवलीत प्रामुख्याने भाजप-शिवसेनेविरुद्ध निवडणूक लढवली होती त्याच मनसेने थेट शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला. यामुळे इथे भाजपची मोठी गोची झाली. कारण मनसेच्या पाठिंब्यामुळे शिवसेना शिंदे गटाला त्यांचा महापौर बनवणं सहज शक्य झालं आहे. पण या सगळ्यामुळेच राज ठाकरेंच्या मनसेने पुन्हा एकदा भूमिका बदलली असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
'राज ठाकरेंनी दिली ही मुभा, म्हणून शिवसेना-भाजपला पाठिंबा दिला'
कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिवसेना-भाजपला दिलेला पाठिंबा यासाठी राज ठाकरेंनीच मुभा दिली होती. असं मनसेचे नेते राजू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. याच थेट अर्थ असा आहे की, पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय हा थेट मनसेच्या हायकमांडकडून आला होता.
हे ही वाचा>> राज ठाकरेंनी मुभा दिली म्हणूनच KDMC मध्ये महायुतीला पाठिंबा, मनसेच्या माजी आमदाराने सगळं सांगितलं
सगळ्यात आधी राजू पाटील नेमकं काय म्हणाले हे आपण जाणून घेऊया...
काही वेळापूर्वीच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेने दिलेल्या पाठिंब्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर मनसे नेते राजू पाटील यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत माहिती दिली.
राजू पाटील म्हणाले की, 'एकीकडे भाजपचे 50 तर शिवसेनेचे 53 नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत केडीएमसीत जो पळवा-पळवीचा खेळ सुरू होता, तो थांबताना आम्हाला दिसत नव्हता. भविष्यात इतर समिती किंवा महत्त्वाच्या टप्प्यांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे एक बाजू स्थिर राहावी, या हेतूनेच आम्ही शिवसेना-भाजपला कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिला आहे.'










