जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोप, मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच समोर, गोखलेंसोबतच्या भागिदारीवरुन सविस्तर भाष्य

Muralidhar Mohol press conferance, Pune : जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोप, मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच समोर आले, स्पष्टीकरण देताना काय म्हणाले?

Mumbai Tak

मुंबई तक

19 Oct 2025 (अपडेटेड: 19 Oct 2025, 11:56 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोप

point

मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच समोर आले, स्पष्टीकरण देताना काय म्हणाले?

Muralidhar Mohol press conferance, Pune : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्यातील जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोप करण्यात येतोय. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी आणि पुण्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मोहोळांवर गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूर्मीवर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मुरलीधर मोहोळ काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात... 

हे वाचलं का?

मुरलीधर मोहोळ स्पष्टीकरण देताना काय म्हणाले?

मुरलीधर मोहोळ म्हणाले, राजू शेट्टी यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे. ते मला दिल्लीत विविध कामांच्या निमित्ताने बोलत असतात, भेटत असतात. मात्र, इतका मोठा आरोप एका लोक प्रतीनिधीवर करत असताना एकदा त्यांनी माझ्याशी बोलायला हवं होतं. तर मी त्यांना सत्य परिस्थिती समजावून सांगितली असती. पुण्यातील नेत्यांनी माझ्यावर आरोप केले. मी केवळ पुण्यातील लोकांसाठी स्पष्टीकरण देत आहे. जैन बोर्डिंगचं जे खरेदी खत झालं. पुण्यातील गोखले बिल्डर या व्यावसायिकाने ते घेतलं व्यवहार झाला. माझ्यावर आरोप केला की, मी गोखले बिल्डरचा पार्टनर आहे. मी लोकसभा निवडणुकीचं प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यामध्ये मी शेती आणि कंस्ट्रक्शनचा व्यवसाय करतो हे सांगितलं होतं. मी पुण्यात बांधकाम व्यावसायिक करतो. एका राजकारणी माणसाने व्यवसाय करु नये का? गोखलेंसोबत जो व्यवहार आहे. त्यांच्यासोबत भागिदारीच्या दोन फर्म होत्या. एक होती गोखले इस्टेट एलएलपी आणि दुसरी होती गोखले फिचर एलएलपी.. या दोन्ही ज्या भागिदारी संस्था आहे. यातील एक संस्था 3 ऑगस्ट 2022 ला आणि दुसरी संस्था 3 फेब्रुवारी 2023 ला तयार झाली. 2023 साली मी आणि विशाल गोखले आम्ही दोघांनी मिळून दोन एलएलपी केल्या. ते पब्लिक डॉक्यमेंट आहे. तुम्ही आज कुठेही जाऊन पाहू शकता. मी एलएलपी या बाहेर पडण्याआधी एकही रुपयाचा व्यवसाय किंवा प्रोजेक्ट झालेला नाही. हे तुम्ही तपासू शकता. आता जैन बोर्डिंगचा विषय आला, तेव्हा मी पार्टनरशिपमध्ये नव्हतो. या व्यवहारात गोखले पार्टनर आहेत आणि मुरलीधर मोहोळांची पार्टनरशिप असल्याचं बोललं जातंय. मी 25 नोव्हेंबर 2024 रोजी  या दोन्ही एलएलपीमधून राजीनामा देऊन बाहेर पडलो. त्याचं ऑफिशियल लेटर मी दाखवत आहे.  

पुढे बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, जैन बोर्डिंगच्या ट्रस्टींनी 16 डिसेंबर रोजी मिटिंग घेऊन जमीन विकासकाला देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अनेक वर्तमान पत्रांमध्ये याची टेंडर नोटीस काढली होती. ही 20-12-2024 रोजी काढली होती. गोखलेंनी ही जमीन विकत घेतली ती 8-10-25 रोजी ...मी बाहेर पडलो 25-11 2025 रोजी... म्हणजे 11 महिन्यापूर्वी ट्रस्टनी विकायचा निर्णय घेतला होता. मुरलीधर मोहोळचा या प्रकरणाशी सबंध कसा आला? पुण्यातील जैन बांधवांनी आरोप केलेला नाही. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. राजू शेट्टींनी माहिती न घेता आरोप केले. त्यानंतर पुण्यातील बिळात बसलेले उंदीर बाहेर आले आणि त्यांनी आरोप केले. 

राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कोणते आरोप केले होते?

सरसंघचालक मोहन भागवत यांनी वेळीच सावध व्हावे अन्यथा पैशाच्या हव्यासापोटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रेशीमबागेचा सुध्दा लिलाव काढायला भाजपचे मंत्री मागे पुढे बघणार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहभागाने  पब्लिक ट्रस्टची ३००० कोटी मालमत्ता २३० कोटी हडपण्याचा  डाव उधळण्यासाठी जैन समाजासह इतर समाजाच्या सहकार्यातून मॅाडेल कॅालनी ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे येथे सन १९५८ ला सकल जैन समाजाचे हिराचंद नेमचंद दोषी यांनी तीन एकर जागेत. एक धर्मादाय ट्रस्ट स्थापन करून समाजाकडून निधी जमा करून दिगंबर जैन बोर्डिंग व जैन मंदिर मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे येथे गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हॉस्टेलची उभारणी केली होती.सातारा,सांगली,कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, आहिल्यानगर सह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील गोरगरीब वंचित घटकातील विद्यार्थ्यांनी याच बोर्डिंगच्या माध्यमातून शिक्षण घेऊन ते स्थिर स्थावर झाले.हिराचंद नेमचंद दोषी यांनी कर्मवीर भाऊराव पाटील , महात्मा जोतिबा फुले , लोकमान्य टिळक , गोपाळ गणेश आगरकर , महर्षी कर्वे , दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे यांचा  आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे उदात्त काम केले. 

मात्र त्यांच्या वारसदारांनी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी ही पब्लिक ट्रस्टची ३ एकर जागा गोखले कंट्रक्शन कंपनी यांना र.रु.२३० कोटी रकमेत विकली आहे. हे सर्व व्यवहार ३० सप्टेंबर २०२५ साठेखत करून गोखले कंट्रक्शन कंपनीने १ आक्टोंबर २०२५ रोजी कर्नाटकातील बिरेश्वर पतसंस्थेकडून ५० कोटी व बुलढाणा अर्बन पतसंस्थेकडून २० कोटी कर्ज मंजूर करून घेतले आहे.ही तीन एकर जागा एच.एन.डी.च्या मालकीची असताना ही जागा गोखले कंट्रक्शन कंपनीला मिळणार आहे असे गृहीत धरून हे ७० कोटी कर्ज मंजूर करण्यात आले आहे. 
       
धर्मादाय आयुक्त  यांनी या पब्लिक ट्रस्टच्या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम,कायदे यांना हरताळ फासून या विक्री व्यवहाराला मंजुरी दिली आहे. हे धर्मादाय आयुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे नातेवाईक आहेत. तर गोखले कंट्रक्शन कंपनी मध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे भागीदार आहेत. या विषयावर पुण्यात गोखले कंट्रक्शन कंपनीच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या प्रकल्पातून ३००० कोटी रुपये आम्हाला मिळणार आहेत असे जाहीर केले होते. म्हणजे ३००० कोटीची मालमत्ता २३० कोटीमध्ये राजाश्रयांने हडप करण्याचा डाव मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांनी मांडला आहे.एकीकडे पुणे हे विद्येचे माहेरघर आहे याठिकाणी अनेक मंडळींनी  गरीबांची मुले शिकावीत म्हणून अशा संस्थाची निर्मीती केली आहे. पैशाच्या हव्यासापोटी या मंडळीनी अशा संस्थाचे लचके तोडण्यास सुरवात केली आहे. वेळीच सरसंघचालक मोहन भागवत यांनी या लोकांना आवरावे अन्यथा एक दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीमबागेचे सुध्दा लिलाव काढायला मागे पुढे बघणार नाहीत.

हेही वाचा : बीड हादरलं! ऐन दिवाळीत तरुणाचा छातीत गोळी लागून मृत्यू, हत्या की आत्महत्या? गुढ कायम

    follow whatsapp