Ravindra Chavan phone call to Devendra Fadnavis : राज्यात महानगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतून भाजपसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वत्र इच्छुकांची गर्दी, नाराजी, बंडखोरी आणि पक्षांतराची चित्रं पाहायला मिळत असताना, भाजपने मात्र थेट विजयाचे खाते उघडले आहे. विशेष म्हणजे, मतदान होण्याआधीच दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ADVERTISEMENT
भाजपच्या दोन नगरसेविका बिनविरोध निवडून आल्या
कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 18 ‘अ’ मधून भाजपच्या उमेदवार रेखा राजन चौधरी यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. हा प्रभाग ओबीसी महिला आरक्षणासाठी राखीव असून, या जागेसाठी केवळ रेखा चौधरी यांचाच अर्ज दाखल झाल्याने त्यांचा बिनविरोध विजय स्पष्ट मानला जात आहे. उद्या कागदपत्रांची पडताळणी होणार असून, त्यानंतर अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. मात्र, राजकीय वर्तुळात या विजयाची चर्चा आधीपासूनच रंगू लागली आहे.
याचबरोबर भाजपला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. प्रभाग क्रमांक 26-क मधून भाजपच्या आसावरी केदार नवरे या उमेदवारही बिनविरोध निवडून आल्या आहेत. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रतिस्पर्धी उमेदवाराने मैदानात उतरण्याची हिंमत न दाखवल्याने या दोन्ही जागांवर भाजपचा विजय मतदानापूर्वीच शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र आहे.
या घडामोडींमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. दोन जागांवर थेट विजय मिळाल्याची माहिती मिळताच चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून ही बातमी दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविकांचे अभिनंदन केले. भाजप नेतृत्वाच्या रणनीतीला मिळालेले हे यश मानले जात असून, कल्याण-डोंबिवलीतील संघटनात्मक ताकदीचे हे प्रतीक असल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे.
रेखा राजन चौधरी या सामाजिक आणि संघटनात्मक पातळीवर सक्रिय असलेल्या नेत्या आहेत. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाशी संबंधित कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी असून, सध्या त्या भाजप महिला मोर्चाच्या कल्याण विभागाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. तर आसावरी नवरे या देखील स्थानिक पातळीवर सक्रिय असून, पक्ष संघटनेत त्यांची चांगली पकड असल्याचे बोलले जाते.
महापालिका निवडणुकीआधीच दोन जागांवर विजय मिळाल्याने भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. येत्या काही दिवसांत कागदपत्र पडताळणीनंतर आणखी काही प्रभागांमध्ये बिनविरोध निवडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपने सुरुवातीलाच आघाडी घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











