देवेंद्र फडणवीसांची अजितदादांवर कुरघोडी, सोलापुरातील राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपने गळाला कसे लावले?

Solapur Politics : देवेंद्र फडणवीसांची अजितदादांवर कुरघोडी, सोलापुरातील राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपने गळाला कसे लावले?

Mumbai Tak

मुंबई तक

17 Oct 2025 (अपडेटेड: 17 Oct 2025, 02:33 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीसांची अजितदादांवर कुरघोडी

point

सोलापुरातील राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

Solapur Politics : सोलापूरच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. स्थानिक पातळीवर मोठी ताकद असलेले नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू मानले जातात. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार गळाला लावून अजित पवारांवर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे. शिवाय, काही दिवसांपूर्वी सोलापुरात  स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. यावेळी या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा देखील केली होती. 

हे वाचलं का?

हेही वाचा : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं अन् अपहरण करुन घाणेरडं कृत्य! अखेर, 16 महिन्यांनंतर समोर आलं आरोपीचं सत्य

माजी आमदारांसाठी वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची बैठक 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी (दि.10) रात्री वर्षा बंगल्यावर सोलापुरातील माजी आमदारांची बैठक घेतली. यावेळी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने उपस्थित होते. शिवाय बबनदादा शिंदे हे सध्या अमेरिकेत उपचार घेत असले तरी देखील त्यांचे रणजित शिंदे आणि विक्रम शिंदे हे दोन्ही पुत्र गुरुवारी देवेंद्र फडणवीसांना भेटले आहेत. दरम्यान, या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा बोलून दाखवली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी देखील होकार दिल्याची माहिती समोर आलीये. काही दिवसांत चारही माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.

दिलीप माने काँग्रेसमधून भाजपात जाणार असल्याची चर्चा

दरम्यान, याबाबत दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी लागलीच प्रतिक्रिया देखील देऊन टाकलीये. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची बैठक झाली असून यापूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी अनेक वेळा चर्चा झाली आहे. दुहेरी पाईपलाईन, सोलापूर-मुंबई विमानसेवा आणि आयटी पार्क या आमच्या प्रमुख मागण्या मुख्यमंत्री यांनी मान्य केल्या आहेत. मी ना सत्ताधारी पक्षात आहे, ना विरोधात; मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आता स्थानिक निवडणुकांसाठी आम्हाला भूमिका घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री यांनी मला सहकार्याची हमी दिली असून त्यांच्या सांगण्यानुसारच आम्ही काम करणार आहोत.” असं दिलीप माने म्हणाले आहेत.

मोहोळच्या राजकारणात राजन पाटलांचं तर माढ्याच्या राजकारणात बबनदादा शिंदेंचं वर्चस्व

राजन पाटील मोहोळचे माजी आमदार राहिले आहेत. मात्र, हा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर राजन पाटील यांना निवडणुकीला उभं राहता आलं नाही. मात्र, राजन पाटील सांगतील तोच आमदार होईल, या समीकरणाची देखील चर्चा रंगली होती. मात्र, 2024 साली राजन पाटील यांनी पाठिंबा दिलेल्या यशवंत माने यांचा पराभव झालाय. दुसरीकडे माढ्यात बबनदादा शिंदेंचं वर्चस्व असलेले पाहायला मिळालंय. बबन शिंदेंनी माढ्यातून तब्बल 6 वेळा निवडून येण्याच पराक्रम केला होता. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बबन शिंदेंचे पुत्र रणजित शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दरवेळी राष्ट्रवादीकडून लढणारे शिंदे कुटुंब यावेळी अपक्ष निवडणुकीला सामोरं गेलं होतं. विशेष म्हणजे माढ्याच्या शिंदे बंधूंना अजित पवारांनी बळ देऊन पुढे आणलं होतं. मात्र, तेच आता भाजपमध्ये जाणार आहेत. 

राजन पाटील आणि बबनदादा शिंदेंचं बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणात आलं होतं नाव

वर्षभरापूर्वी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणात राजन पाटील आणि बबनदादा शिंदे यांना मोठा झटका बसला होता. कर्ज वाटप प्रकरणात जबाबदार धरलेल्या तत्कालीन संचालक मंडळासह बँकेचे दोन अधिकारी, एका चार्टड अकाउंटटकडून वसुली करण्याचे आदेश काढण्यात आले होते. यानुसार बबनराव शिंदे यांच्याकडून 3 कोटी 49,23,041 रुपये तर राजन पाटील यांच्याकडून 3 कोटी 34,21,357 रुपयांची वसुली होणार असल्याची चर्चा होती. याबाबत बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी तक्रार दिली होती. विशेष म्हणजे या प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचा देखील समावेश होता.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

नागपूर : क्रिकेट खेळताना अवघड जागेला बॅट लागली, 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, महिनाभरापूर्वीच वडिलांचं झालं होतं निधन

 

 

 

 

 

 

 

    follow whatsapp