Supriya Sule : गणेश जाधव - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरात संतोष परमेश्वर या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याने नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. संतोष परमेश्वर हे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आहेत, अशा लोकांना भाजप आश्रय देत आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपने आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे. तसेच पत्रात तातडीने कारवाईची देखील मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : वॉर्ड OBC साठी राखीव, तेजस्वी घोसाळकरांना निवडणूक लढता येईना, फेसबुक पोस्टने वेधलं लक्ष
ड्रग्स तस्करांना भाजपमध्ये राजाश्रय मिळतोय, हे बघून चिंता आणि हे खेदजनक असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. हा प्रवेश राणा जगजितसिंह पाटलांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावरून सुप्रिया सुळेंनी नाव न घेता जबाबदार व्यक्तींच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला असून ही बाब समाजमनात चिंतेची भावना निर्माण करणारी आहे.
सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
सुप्रिया सुळेंनी पत्रात नमूद केलं की, तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आला असून त्यामध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींचा देखील समावेश होता. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले, ही बाब समाजमनात चिंतेची भावना निर्माण करणारी आहे.
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे. परंतु समाजविघातक आणि अनिष्ट प्रवृत्तीला थारा न देण्याची जबाबदारी सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर आहे, असेही सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे.
आपण राज्याचे प्रमुख आहात, त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्या निदर्शनास आली नसावी किंवा संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीबाबत आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात आली नसावी, हे गृहित धरून मी हे पत्र लिहित आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत.
हे ही वाचा : तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील आरोपीचा भाजपमध्ये प्रवेश, राणा जगजितसिंह पाटलांचं निवडणुकीआधी तगडं प्लानिंग
तुळजापूरमधील या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.ड्रग्ज तस्करीला महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही, असा ठाम संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी, यासाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT











