तब्बल ५० वर्षांनी टीम इंडियाला इंग्लंडमध्ये ओव्हलचं मैदान मारण्यात यश आलेलं आहे. कसोटीच्या अखेरच्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा दुसरा डाव २१० धावांवर संपवत १५७ रन्सनी बाजी मारली. १९७१ साली भारताने ओव्हलच्या मैदानावर आपला पहिला आणि शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. यानंतर तब्बल ५० वर्षांनी ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आलंय.
ADVERTISEMENT
१९७१ नंतर झालेल्या सामन्यांपैकी ३ सामना अनिर्णित राहिले तर ३ सामन्यांत इंग्लंडने बाजी मारली होती. यादरम्यान भारताला या मैदानावर कधीच यश आलं नव्हतं. परंतू कोहलीच्या टीमने ५० वर्षांनी हा इतिहास बदलून दाखवला.
Breaking News : टीम इंडियाचे प्रशिक्षक Ravi Shastri यांना कोरोनाची लागण
चौथ्या दिवसाअखेरीस इंग्लंडच्या सलामीवीरांनी एकही विकेट न गमावता ७७ धावा केल्या. अखेरच्या दिवशी हासीब हमीद आणि रोरी बर्न्स यांनी सावध सुरुवात केली. अखेरीस शार्दुल ठाकूरने बर्न्सला पंतकरवी आऊट केलं. बर्न्सने ५० धावा केल्या. यानंतर ड्वाइड मलान ठराविक अंतराने चोरटी धाव काढताना धावबाद झाला. दुसऱ्या बाजूला हासीब हमीदने एक बाजू लावून धरली होती. यादरम्यान त्याने आपलं अर्धशतकही साजरं केलं.
लंच सेशननंतर टीम इंडियाच्या बॉलर्सनी सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. रविंद्र जाडेजाने मैदानावर स्थिरावलेल्या हासीब हामीदला ६३ धावांवर क्लिन बोल्ड केलं. यानंतर इंग्लंडच्या मधल्या फळीला खिंडार पाडलं. ऑली पोप, जॉनी बेअरस्टो, मोईन अली यांना भारताने झटपट माघारी धाडलं.
Explainer : Ravindra Jadeja ला फलंदाजीत बढती ही Ajinkya Rahane साठी धोक्याची घंटा?
यानंतर ख्रिस वोक्स आणि क्रेग ओव्हर्टन यांनी पुन्हा एकदा छोटेखानी भागीदारी रचून भारतीय बॉलर्सना तंगवलं. परंतू चहापानानंतर भारतीय बॉलर्सनी इंग्लंडच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांवर शेवटचा घाव टाकत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयासह भारताने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाकडून उमेश यादवने ३ तर जसप्रीत बुमराह, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. इंग्लंडचा एक खेळाडू धावबाद झाला.
ADVERTISEMENT