IPL 2021 : सामना जिंकूनही गतविजेते मुंबई इंडियन्स प्ले-ऑफमधून बाहेर

मुंबई तक

• 06:05 PM • 08 Oct 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. अखेरच्या साखळी सामन्यात २३५ धावांचा डोंगर ऊभारुनही मुंबईचे गोलंदाज हैदराबादला ६५ धावांत गुंडाळण्यात अपयशी ठरले. सरतेशेवटी मुंबईने ४२ रन्सनी सामन्यात बाजी मारली असली तरीही स्पर्धेतलं त्यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. १४ गुणांसह मुंबईचा संघ पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर राहिला असून मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सला […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. अखेरच्या साखळी सामन्यात २३५ धावांचा डोंगर ऊभारुनही मुंबईचे गोलंदाज हैदराबादला ६५ धावांत गुंडाळण्यात अपयशी ठरले. सरतेशेवटी मुंबईने ४२ रन्सनी सामन्यात बाजी मारली असली तरीही स्पर्धेतलं त्यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

हे वाचलं का?

१४ गुणांसह मुंबईचा संघ पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर राहिला असून मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सला प्ले-ऑफचं तिकीट मिळालं आहे. तसेच मुंबई इंडियन्सचं सलग तिसऱ्यांना आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अपुरं राहिलं आहे.

नाणेफेक जिंकून मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. आजचा सामना मुंबई इंडियन्सला १७१ धावांच्या फरकाने जिंकायचा होता. त्यामुळे २०० पेक्षा जास्त धावसंख्या उभारणं मुंबईला गरजेचं होतं. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी सुरुवातीपासून धडाकेबाज फटकेबाजी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. सहाव्या ओव्हरमध्ये मुंबईने ८० धावांचा टप्पा गाठला होता. परंतू मुंबईचे महत्वाचे फलंदाज या सामन्यात फटकेबाजी करण्यात अपयशी ठरले.

हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, जिमी निशम, कृणाल पांड्या हे गरजेच्या वेळी फटकेबाजी करु शकले नाहीत. सूर्यकुमार यादवने हैदराबादची धुलाई करत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. इशान किशनने ८४ तर सूर्यकुमारने ८२ रन्स केल्या. या जोरावर मुंबईने २३५ पर्यंत मजल मारली. ज्यानंतर सामना जिंकायला मुंबईला हैदराबादला ६५ धावांमध्ये गुंडाळण्याचं लक्ष्य होतं.

परंतू हैदराबादचे सलामीवीर जेसन रॉय आणि अभिषेक शर्मा यांनी मुंबईच्या आशांवरती पाणी फिरवलं. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी करत कोलकाता नाईट रायडर्सला प्ले-ऑफमध्ये संधी मिळेल याची खात्री केली. ट्रेंट बोल्टने जेसन रॉयला आऊट करत हैदराबादची जोडी फोडली खरी, परंतू तोपर्यंत पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. यानंतर कॅप्टन मनिष पांडेचं अर्धशतक आणि मधल्या फळीत प्रियम गर्गची फटकेबाजी वगळता हैदराबादचे फलंदाज कमाल दाखवू शकले नाही. निर्धारित ओव्हर्समध्ये हैदराबादचा संघ १९३ धावांपर्यंत मजल मारु शकला आणि मुंबईने पर्वाची अखेर विजयाने करत पाचवं स्थान मिळवलं. मुंबईकडून निशम, कुल्टर-नाईल, बुमराह यांनी प्रत्येकी २-२ तर बोल्ट आणि चावलाने १-१ विकेट घेतली.

    follow whatsapp