अजिंक्यचं दणक्यात पुनरागमन ! गतविजेत्या सौराष्ट्राविरुद्ध शतकी खेळी, मुंबई सुस्थितीत

मुंबई तक

• 01:09 PM • 17 Feb 2022

गेल्या काही दिवसांपासून आपल्या खराब कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या अजिंक्य रहाणेने दमदार पुनरागमन केल आहे. आजपासून सुरु झालेल्या रणजी करंडक सामन्यात अजिंक्यने गतविजेत्या सौराष्ट्राविरुद्ध सामन्यात खेळत असताना शतकी खेळी करुन संघाची बाजू मजबूत केली आहे. अजिंक्यने आपला सहकारी शतकवीर सर्फराज खानला उत्तम साथ देत पहिल्या दिवसाअखेरीस मुंबईला द्विशतकी धावसंख्या ओलांडून दिली. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने […]

Mumbaitak
follow google news

गेल्या काही दिवसांपासून आपल्या खराब कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या अजिंक्य रहाणेने दमदार पुनरागमन केल आहे. आजपासून सुरु झालेल्या रणजी करंडक सामन्यात अजिंक्यने गतविजेत्या सौराष्ट्राविरुद्ध सामन्यात खेळत असताना शतकी खेळी करुन संघाची बाजू मजबूत केली आहे. अजिंक्यने आपला सहकारी शतकवीर सर्फराज खानला उत्तम साथ देत पहिल्या दिवसाअखेरीस मुंबईला द्विशतकी धावसंख्या ओलांडून दिली.

हे वाचलं का?

पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने सौराष्ट्राविरुद्ध नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतू मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि आकर्षित गोमेल यांना झटपट माघारी धाडण्यात सौराष्ट्राच्या बॉलर्सना यश आलं. यानंतर सचिन यादव आणि अजिंक्य रहाणेने काहीकाळ भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू सचिव यादवही चिराग जानीच्या बॉलिंगवर आऊट झाल्यामुळे मुंबईचा संघ ३ बाद ४४ अशा खडतर अवस्थेत सापडला.

U-19 विश्वचषक विजेता कर्णधार, रणजी पदार्पणात शतक; युवा यश धुल चमकला

यानंतर अजिंक्यने मधल्या फळीत सर्फराज खानला हाताशी धरत मुंबईच्या डावाला आकार दिला. दोन्ही खेळाडूंनी सौराष्ट्राच्या गोलंदाजीचा नेटाने सामना करत मैदानावर जम बसवला. जम बसल्यानंतर दोघांनीही मैदानात चौफेर फटकेबाजी केली. सर्फराजने आक्रमक पवित्रा घेत २१९ बॉलमध्ये १५ चौकार आणि २ षटकारांसह १२१ धावा केल्या. अजिंक्यनेही त्याला उत्तम साथ देत दिवसाअखेरीस १०८ धावांपर्यंत मजल मारली आहे. चौथ्या विकेटसाठी २०९ धावांच्या भागीदारीमुळे मुंबईची बाजू भक्कम झाली असून पहिल्या दिवसाअखेरीस मुंबईने ३ विकेट गमावत २६३ धावांपर्यंत मजल मारली आहे.

ऑस्ट्रेलियात मी घेतलेल्या निर्णयाचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं – अजिंक्य रहाणेने बोलून दाखवली खदखद

अजिंक्य रहाणेसाठी यंदाची रणजी करंडक स्पर्धा अत्यंत महत्वाची होती. गेल्या काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खराब कामगिरीमुळे चर्चेत राहिलेल्या अजिंक्यला आपलं कसोटी संघाचं उप-कर्णधारपद गमवावं लागलं होतं. त्यातच आगामी श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठीही त्याचं संघातलं स्थान निश्चीत मानलं जात नाहीये. यासाठी अजिंक्यला रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता. अजिंक्यनेही या संधीचं सोनं करुन पहिल्याचं सामन्यात आपला अनुभव पणाला लावत शतकी खेळी केली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या खेळात आता हे फलंदाज किती मोठी मजल मारतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp