SA vs IND : जोहान्सबर्ग कसोटी दोलायमान स्थितीत, दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताकडे ५८ धावांची आघाडी

मुंबई तक

• 04:03 PM • 04 Jan 2022

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी सामना दोलायमान अवस्थेत आला आहे. पहिल्या डावात आफ्रिकेने २७ धावांची नाममात्र आघाडी घेतल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाअखेरीस दोन विकेट गमावत ८५ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडे सध्याच्या घडीला ५८ धावांची आघाडी असून हा सामना जिंकण्यासाठी जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज कसा खेळ करतात याकडे सर्वांचं लक्ष […]

Mumbaitak
follow google news

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी सामना दोलायमान अवस्थेत आला आहे. पहिल्या डावात आफ्रिकेने २७ धावांची नाममात्र आघाडी घेतल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाअखेरीस दोन विकेट गमावत ८५ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडे सध्याच्या घडीला ५८ धावांची आघाडी असून हा सामना जिंकण्यासाठी जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज कसा खेळ करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

हे वाचलं का?

शार्दुल ठाकूरने सात बळी घेत भेदक मारा केला आणि आफ्रिकेला मोठी आघाडी घेऊ दिली नाही. दुसऱ्या डावातही भारतीय संघाने सावध सुरुवात केली. परंतू विराटच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व करणारा राहुल जेन्सनच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतला. यानंतर चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवालने काहीकाळ संघाची बाजू सावरली. परंतू ऑलिव्हरने मयांकला आपल्या जाळ्यात अडकवत भारताला दुसरा धक्का दिला.

फॉर्म गमावलेले चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यानंतर मैदानात आल्यामुळे भारतीय चाहत्यांच्या मनात टेन्शन होतं. परंतू पुजारा आणि रहाणेने अखेरच्या सत्रात संयमी खेळ करत भारताची पडझड रोखली. दोन्ही फलंदाजांनी या सत्रात खराब चेंडूवर काही सुरेख फटके लगावले. त्यामुळे तिसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय फलंदाज आफ्रिकेचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

त्याआधी, भारताने पहिल्या डावात २०२ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर आफ्रिकेने २२९ धावांपर्यंत मजल मारली. मोठी आघाडी घेण्याचं आफ्रिकेचं स्वप्न भारताच्या शार्दुल ठाकूरने उधळून लावलं. पालघरच्या शार्दुलने ७ विकेट घेत दुसऱ्या दिवशी आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडलं.

पहिल्या दिवसाअखेरीस आफ्रिकेने १ विकेट गमावत ३५ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या दिवशी आफ्रिकन फलंदाज मोठी आघाडी घेण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरले खरे, परंतू शार्दुल ठाकूरने आपल्या गोलंदाजीत सुरेख मिश्रण करत आफ्रिकेच्या फलंदाजांना बॅकफूटला ढकललं. मोक्याच्या क्षणी आफ्रिकेच्या फलंदाजांची भागीदारी मोडून शार्दुलने भारताचं आव्हान या सामन्यात कायम राखलं.

    follow whatsapp