कसोटी मालिका १-२ च्या फरकाने गमावलेल्या भारतीय संघाची वन-डे मालिकेतही खराब सुरुवात झाली आहे. पहिल्याच वन-डे सामन्यात आफ्रिकेने भारतावर ३१ धावांनी मात केली आहे. या विजयासह आफ्रिकेने तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. २९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचं आव्हान संपुष्टात आलं.
ADVERTISEMENT
नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. डी-कॉक आणि मलान जोडीने आफ्रिकेला सावध सुरुवात करुन दिली. ज्यानंतर बुमराहने मलानला आऊट करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर डी-कॉकने टेंबा बावुमाच्या साथीने संघाचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांमध्ये छोटेखानी भागीदारी झाल्यानंतर आश्विनने डी-कॉकला माघारी धाडत आफ्रिकेला दुसरा धक्का दिला. एडन मार्क्रमही ठराविक अंतराने व्यंकटेश अय्यरच्या अचूक थ्रोवर रन आऊट झाल्यामुळे आफ्रिकेच्या अडचणींमध्ये वाढ झाली.
परंतू यानंतर टेंबा बावुमा आणि व्हॅन डर डसेनने मैदानावर जम बसवत भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणायला सुरुवात केली. चौथ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी २०४ धावांची भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी सुंदर फटकेबाजी करत आपलं शतक पूर्ण केलं. जसप्रीत बुमराहने टेंबा बावुमाला आऊट करत आफ्रिकेची जोडी फोडली. परंतू तोपर्यंत आफ्रिकेने सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. भारताकडून बुमराहने दोन तर आश्विनने एक विकेट घेतली.
SA vs IND : कॅप्टन्सीची जबाबदारी गेली, पहिल्याच सामन्यात विराटने मोडला सचिनचा विक्रम
प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. संघात पुनरागमन केलेला शिखर धवन आणि लोकेश राहुलने भारताला पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करुन दिली. मार्क्रमने लोकेश राहुलला आऊट करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर मैदानावर आलेल्या विराट कोहलीने शिखर धवनला उत्तम साथ देत भारताच्या डावाला आकार दिला. ९२ धावांच्या भागीदारीमध्ये शिखर धवन आणि विराट कोहली या दोघांनीही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. विराट आणि शिखर मैदानावर असताना भारत हा सामना जिंकेल असं वाटत होतं. केशव महाराजने शिखर धवनला क्लिन बोल्ड करत भारताला दुसरा धक्का दिला.
यानंतर विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी काहीकाळ संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू शम्सीच्या एका बॉलवर विराट कोहली फसला आणि भारताला तिसरा धक्का बसला. यानंतर मधल्या फळीतल्या भारतीय फलंदाजांनी पुरती निराशा केली. पंत, अय्यर, व्यंकटेश अय्यर, आश्विन हे फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले ज्यामुळे आफ्रिकेने सामन्यात पुन्हा एकदा पुनरागमन केलं. शार्दुल ठाकूरने अखेरच्या ओव्हर्समध्ये जसप्रीत बुमराहच्या साथीने फटकेबाजी करत नाबाद अर्धशतक झळकावलं खरं, परंतू तोपर्यंत सामना भारताच्या हातातून निसटला होता.
Virat Kohli Test Captaincy: BCCI रोहितला कसोटी कर्णधार करण्याच्या मूडमध्ये नाही! ‘या’ खेळाडूचं नाव आघाडीवर
भारताचा संघ या सामन्यात ८ विकेट गमावत २६५ धावांपर्यंत मजल मारु शकला. शार्दुल ठाकूरने नाबाद ५० धावांची खेळी करत भारताची लाज लाखली. आफ्रिकेकडून फेलुक्वायो, शम्सी, एन्गिडी यांनी प्रत्येकी २-२ तर केशव महाराज आणि मार्क्रमने १-१ विकेट घेतली.
ADVERTISEMENT